Wednesday, December 19, 2018

गीता वाटपाचे कर्म



गीता वाटपाचे कर्म

डाॅ. ह. नि. सोनकांबळे 
dr.hanisonkamble@gmail.com


कार्ल मार्क्स ने समाजाची विभागणी जरी दोन वर्गात केली असली तरी बहुरंगी संसकृती असलेल्या भारतात मात्र प्रमुख्याने तीन वर्ग आहेत. श्रीमंत, मध्यम आणि गरीब यातल्या पहिल्या आणि तिसऱ्या वर्गाला धर्माशी, दैववादाशी काही एक देणे घेणे नसते. तो त्याचे पालन सोईनुसार  करत असतो. कारण या वर्गाचे भाकरीचे प्रश्न मिटलेले असतात आणि आम्ही जे काही ऐश्वर्य प्राप्त केले आहे ते स्वकष्टाचे आहे यात कोणत्याही धर्मीक अथवा दैवी शक्तीचा हस्तक्षेप नाही याची जाणीव या वर्गाला झालेली असते. यातल्या तिसऱ्या वर्गाचे भाकरीचे प्रश्न मिटलेले नसतात त्यामूळे या वर्गाला जो आज आपल्याला भाकर देतो तोच आपला धर्म आहे असे वाटत असते. प्रश्न आहे तो मध्यम वर्गाचा त्याला कधीच खालच्या वर्गात यावे वाटत नाही आणि वरच्या वर्गात जाण्याची धडपड जरी त्यांची असली तरी त्याला दैवी शक्ती प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही असे वाटत असते. म्हणून तो नेहमी या दैवी शक्तीला जागृत करण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि धर्माच्या प्रचार प्रसाराने आणि आचरणाने ईश्वर खुश होत असतो असे त्याला वाटत असते. त्यामूळे तो ‘स्वकर्मणा तमभ्यच्र्य सिध्दि विन्दत मानवः!’ असे म्हणून चालत असतो. म्हणूनच की काय जाॅन ब्रेमन हा हिटलरकालीन विचारवंत ‘द हिंदू राईट’ या लेखात असे म्हणतो की, मध्यम वर्गच खऱ्या  अर्थाने धार्मिक विचाराला खतपाणी घालत असतो. याच वर्गाने भारतात हिंदूत्ववाद आणि जर्मनीत फॅसिझमचा प्रभाव वाढविण्यासाठी हातभार लावला आहे. असा दावाही त्याने आहे रो कदाचित खरंच असावा.  म्हणून भारतात सध्या महावि़द्यालयामध्ये सुरु असलेला गीता वाटपाचा कार्यक्रम बहुरंगी संस्कृती असलेल्या भारताला काही नवीन आहे अशातला भाग नाही. परंतु या सर्वच धर्म ग्रंथाला हिंदू धर्मातच दोन बाजू आहेत.
    पहिली बाजू मांडताना सावरकर असे म्हणता की, हिंदू धर्मात जे प्राचिन आणि हिंदू धर्माला मार्गदर्शक ठरले ते सर्व धर्मग्रंथ कालबाहय ठरले असून ते नष्ट करावेत अथवा कोपऱ्यात टाकून द्यावेत.  आणि दुसरी बाजू मांडताना गोळवलकर असे म्हणतात की, भगवतगीता आणि वेद हे हिंदुत्वाचे आधार आणि प्रमाण आहेत. म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आता प्रश्न असा आहे की, जर सावरकरांचे म्हणने न ऐकता गोळवलकरांच्या म्हणण्याप्रमाणे या धर्म ग्रंथांना प्रमाण माणले तर समाजातल पहिला वर्ग जो अर्थातच प्रचंड श्रीमंत आहे तो याचे पालन करेल का? कारण गोळवलकरांची अशी अपेक्षा आहे की, मनूने सांगितल्याप्रमाणे ‘यावत भ्रियेत जठरं तावत स्वत्वं हि देहिनाम’ अधिक योद्यभिमन्येत स स्तेनो दण्डमर्हति’ याचा अर्थ देहधारणेला जेवढे आवश्यक असेल तेवढेच ग्रहण करा, त्याहून जो अधिक ग्रहण करतो तो चोर आहे आणि म्हणूनच तो दंडणीय आहे. याचा अर्थ पहिला वर्ग या शिक्षेस पात्र आहे असेच म्हणावे लागेल. पण धर्म ग्रंथाचे वाटप करणारे सरकार या धर्म ग्रंथाचा आधार घेवून यांना शिक्षा करेल का? म्हणून धर्म ग्रंथ वाटणे आणि त्याचे पालन करणे या दोन वेगवेगळया गोष्टी आहेत. आपण कितीही जबरदस्तीने या धर्म ग्रंथाचे वाटप केले तरी ते घरात ठेवायचे की सावरकरांकडे द्यायचे याचा विचार सुज्ञ लोकांनी करायचा असतो.
    तसा हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असून तो फार जूना आहे. 1982 ला दत्तोपंत ठेंगडी यांनी स्थापन केलेल्या ‘भारतीय विचार केंद्रम’ या संस्थेने गीता या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘भारतीय विचार केंद्रम रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट’ या नावाने विविध विद्यापीठात शाखा सुरु केल्या आणि 1998 हे वर्ष ‘गीता वर्ष’ म्हणून साजरे केले. त्या निमित्ताने केरळ या राज्यात 400 गीता शिबीराचे आयोजन करण्यात आले. इतकेच नाही तर ‘द भगवत गीता अॅन्ड माॅडर्न प्राॅब्लेम’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र देखिल भरविण्यात आले. परंतु तुर्तास तरी या सर्व कार्यक्रमाचा केरळ मध्ये काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. कारण आता लोक प्रत्येक वस्तूची उपयुक्तता बघून ठरवतात की, एखाद्याने आपल्याला फुकटात काही दिले तर ते घ्यायचे की नाही?  
    म्हणून एखाद्याने फुकटात गीता वाटली, दुसर्याने कुराण वाटले, तिसऱ्याने बायबल वाटले आणि चैथ्याने जर संविधान वाटले तर वाचणारा व्यक्ती काही अडाणी नाही तो वाचेल आणि आपल्या घरात आणि डोक्यात काय ठेवायचे याचा विचार करेल. कारण हजारो वर्षापासूनच्या गुलामीतून ज्या ग्रंथाने आम्हाला मुक्त केले तो ग्रंथ प्रमाण मानायचा की ज्या ग्रंथांनी गुलाम ठेवले ते ग्रंथ प्रमाण मानायचे हे लोकच ठरवतील. कारण या ग्रंथांना जर लोकांनी प्रमाण मानले असते तर आज हे ग्रंथ लोकांच्या घरात असते आज असे मोफत वाटण्याची वेळ सरकारवर किंवा कोणत्याही धार्मिक संस्थेवर आली नसती.  आणखी एक गोष्ट हे ग्रंथ वाटणाऱ्यानी लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्या या कृतीमूळे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा जनतेषी संघर्ष निर्माण होता कामा नये. आणि असा संघर्ष  भविष्यात निर्माण झालाच तर फिलिपिन्स च्या राष्ट्राध्याक्षाप्रमाणे ईश्वराचे  अस्तित्व सिध्द करुन दाखवा असा प्रश्न जनताच या दोन्ही सत्तेला विचारेल आणि हे जर सिध्द नाही करता आले तर आपल्याला ठावूकच आहे फुकटच्या वस्तूची किंमत ही नेहमी शून्यच असते. तरी परंतु या ग्रंथाला पुन्हा एकदा किंमत प्राप्त व्हावी हा हेतू जर गीता वाटपाच्या कर्मामागे असेल तर त्यांनी उद्या निर्माण होणाऱ्या  प्रश्नाच्या उत्तरासह सज्ज रहावे.  अन्यथा धर्म आणि धर्मग्रंथ दोन्ही खोटे ठरण्याची शक्यता आहे.

डाॅ. ह. नि. सोनकांबळे
लेखक: राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. 

महाराष्ट्र टाइम्स  प्रकाशित लेख १५ जुलै २०१८

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रविकासाची ब्लू (निळी) प्रिंट




डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रविकासाची ब्लू प्रिंट 
 
डॉ. ह. नि. सोनकांबळे
dr.hanisonkamble@gmail.com


विनंती :  कृपया बाजूला असलेल्या Follow या बटनावर क्लिक करा.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्यावर अतिषय समर्पक भाष्य अत्रे यांच्या लेखणीतून बाहेर आल्याचे दिसते. आचार्य प्र. के. अत्रे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘नवभारताचे निर्माते’ असे संबोधले आणि यातच सर्व काही आले असे म्हणावयास हरकत नाही. पण त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला समजून घेण्यास आमचे व्यक्तीमत्व मात्र नंतरच्या काळात खुजे पडले हे मान्यच करावे लागेल. आजही त्यांच्यावर होणारी टीका हे त्याचेच द्योतक आहे. परंतु दिवसेंदिवस भारतीय राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हा विषय महत्वाचा आणि गांभीर्याचा बनत चालला आहे. एके काळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘दलित’ या शब्दात बंदीस्त करण्यासाठी अनेकांनी टोकाचे प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते. कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे नंतरच्या काळात केवळ भारतापुरते मर्यादित राहिल्याचे दिसत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो एम्बकी यांनी जानेवारी 2008 मध्ये त्यांच्या संसदेत दिलेले भाषण, ब्रिटीश पार्लमंेटचे सदस्य जेरमी कार्बीन यांनी अनेक वेळा ब्रिटीश संसदेमध्ये दिलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ आणि त्याच संसदेचे सदस्य जेफ्री हून यांनी भारताची केलेली आधुनिक व्याख्या याशिवाय, शिक्षणक्षेत्रात केलंबिया विद्यापीठ, सायमन फ्रेजर विद्यापीठ, याॅर्क विद्यापीठ, आणि लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स मध्ये वेळो वेळी होणारी चर्चा आणि हंगेरी मध्ये त्यांच्या नावाने उभरण्यात आलेल्या शाळा, या जागतीक स्तरावरच्या घटना त्यांच्या विचारांची प्रासंगीकता आणि महत्व सिध्द करतात. 


भारतात मात्र आजूनही त्यांची ओळख ‘दलीत’ या शब्दाअंतर्गत करण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही दलितांसाठी केले आम्हा हिंदूसाठी काहीच केले नाही. ही भावना इथल्या काही हिंदूमध्ये आजही आहे. याचे उत्तर इथल्या हिंदू धर्मातील लोकांना समजावून सांगत असताना आणि सावरकर ते भाजप या ग्रंथाचा शेवट करत असताना स. ह. देशपांडे यांनी दिलेले उत्तर मला हिंदू जनतेसाठी महत्वाचे वाटते. ते म्हणतात, ‘डाॅ. आंबेडकरांनी 1927 सालीच हिंदुमात्रांच्या जन्मसिध्द हक्काचा जाहिरनामा प्रसिध्द केला होता त्यात नव्या समाजरचनेची सूत्रे सांगीतली होती. हया विषम समाजरचनेची कडू फळे चाखायचे नशिबी आलेला पण मन हिंदुत्वाएवढे मोठे केलेला एक दलित विव्दान आणि लढवयया नेता साठसत्तर वर्षांपूर्वी हिंदुसंघटनपक्षास मिळाला असता तर देशाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली असती. ती संधी त्या काळच्या हिंदुत्ववाद्यांनी घालवली आहे. परंतु ती संधी आजच्या हिंदूंनी तरी घालवू नये असे मला वाटते. देशपांडे यांच्या या वाक्याचा अर्थ आजच्या हिंदू पिढीनेतरी समजून घेतला पाहिजे. कारण या देशातल्या सर्व जनतेच्या उध्दाराचा विचार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. 


देशाची फाळणी होण्याच्या आगोदरच त्यांनी लोकसंख्येच्या आदलाबदलीचा विचार मांडला होता. कारण एकवेळेस पाकिस्तानमध्ये जर हिंदू जनता अडकून राहिली तर त्यांना भविष्यात खूप त्रास सहन करावा लागेल याची जाणीव त्यांना होती. परंतु त्याकडे तत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्लक्ष केले गेले. फाळणी झाल्यानंतर देखिल पाकिस्तानात अडकून पडलेल्या हिंदूंना भारतात आणण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरु आणि पटेलांकडे आग्रह धरला आणि महार बटालियन पाठवून पाकिस्तानातल्या हिंदूंना भारतात आणले गेले. परंतु या गोष्टी आपण आजही समजून घेत नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळयात नेहमी हे राष्ट्र आणि या राष्ट्रात राहणारा व्यक्ती होता. त्यांनी या दोघांच्या विकासाचा जेवढा विचार केला होता तेवढा कदाचितच कोणत्या नेत्याने केला असावा. म्हणूनच प्र. के अत्रे असे म्हणतात की, ‘अखंड भारताचा, ऐक्याचा आणि स्वातंत्र्याचा त्यांच्याएवढा प्रचंड निष्ठावंत पुरस्कर्ता या देशात दुसरा नाही. परंतु त्यांना आपण केवळ हिंदूंचे आणि भारतीय स्वातंत्र्याचे विरोधक एवढयापुरतेच मर्यादित समजून घेतले. 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच ‘दलित’ या घटकापूरता मर्यादित आणि संकूचित विचार केला नाही. भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणीक विकासाची ‘निळी प्रिंट’ (ब्लू प्रिंट) त्यांनी आगोदरच तयार करुन ठेवली होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीमत्व केवळ आजचा विचार करणारे नव्हते ते आजच्यासह उद्याचाही विचार करायचे. या देषाला एका वेगळया उंचीवर नेवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. म्हणूनच नवयुगच्या एका लेखात अत्रे यांनी स्पष्ट पणे असे आवाहन केले होते की, अमेरिका आणि रशिया यांच्याशी स्पर्धा करण्याइतके सामर्त्य या देशाच्या अंगी यावे असे आपल्याला जर वाटत असेल, तर आपण हया देशाच्या भवितव्याची सूत्रे नेहरु आणि आंबेडकरांसारख्या अव्दितीय बुध्दिमत्तेच्या मुत्सुद्यांच्या हाती सोपविली पोहिजेत. परंतु भविष्यात तसे झाले नाही. वेळोवेळी त्यांना हिंदू विरोधी विशेषणे लावून त्यांचा राजकीय पराभव केला गेला. यासाठी अडाणी आणि धर्मभोळया जनतेचा त्यांच्या विरोधात वापर केला गेला. 


त्यांनी जेव्हा स्त्रियांच्या उध्दारासाठी हिंदू कोड बिल मांडले तेव्हा अडाणी आणि धर्मभोळ्या स्त्रियांचा वापर त्यांच्या विरोधात केला गेला याचा स्पष्ट उल्ल्ेाख ग्रॅनव्हिल आॅस्टिन यांनी केला आहे. बाबासाहेबांच्या दिल्लीच्या निवासस्थानावर हिंदू कोड बिलाच्या विरोधात मोर्चा पाठवला गेला. आमच्या सांस्कृतीक वैभवाचे डाॅ. आंबेडकर हेच विरोधक आहेत असा भास कायम ठेवला गेला आणि त्यांच्या विकासाच्या ‘ब्लू प्रिंट’ ला सातत्याने विरोध होत गेला. पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे रसायनच असे होते की, त्यंानी आगोदरच सांगितले होते तुम्ही माझ्या विचाराकडे दुर्लक्ष करु शकत नाही आणि ते सार्थही ठरले. ज्या हिंदू कोड बिलासाठी त्यांनी अट्टाहास धरला होता परंतु ते तत्कालीन परिस्थितीत मंजूर झाले नाही. त्याच हिंदू कोड बिलावर आधारीत स्त्रियांच्या उध्दारासाठी भविष्यात बावीस हून अधिक कायदे तयार केले गेले. पण हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर अधारीत आहेत हे इथल्या व्यवस्थेने लोकांना कळूच दिले नाही. कामगार मंत्री असताना धनाबादच्या कोळशाच्या खाणीला भेट देवून आल्यानंतर गरोदर स्त्रियांना पगारी सुट्रया मिळाव्यात यासाठी कायदा त्यांनीच तयार केला. आज त्या कायद्यातील सुटयांचे प्रमाण सहा महिने झाले आहे. परंतु याची जाणीव किती भारतीय स्त्रीयांना आहे हा प्रश्नच आहे. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत का? याचा शोध आम्हा भारतीयांनी घेतला पाहिजे. 


देशाला भेडसावणारे प्रश्न मग तो भारत पाकिस्तान फाळणीचा असो, काश्मीरचा असो की भारताच्या अंतर्गत आणि बाहय सुरक्षेचा असो अशा कितीतरी प्रश्नावर त्यांनी उत्तरे शोधून ठेवली आहेत. परंतु ते समजून घेवून त्याची आमलबजवाणी करण्यात आमची राजकीय शक्ती कमी पडत आहे असेच म्हणावे लागेल. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राच्या विकासाला चालणा देणारे नदी जोड प्रकल्प, उर्जा प्रकल्प,शै क्षणिक धोरणे याचा आराखडाच तयार केला होता. परंतु त्यांच्या जाण्याने अशी कितीतरी कामे आजही अपूर्णच आहेत. आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्टेजवर दिसत आहेत परंतु त्यांच्या राष्ट्राच्या आणि मानवतेव्या विकासाची ब्लू प्रिंट कोणाकडेही नाही. ज्या दिवशी ही ब्लू प्रिंट घेवून एखादा राजकीय पक्ष या देशाच्या सत्तेवर येईल त्याच दिवशी आपण खऱ्या अर्थाने या महाकारुणीकाला समजून घेण्यात यशस्वी ठरणार आहोत. 

लेखक: एमजीएम विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व शासन विभागात सहाय्यक प्राद्यापक आहेत.