...आणि वाजपेयींनी नेहरूंचा फोटो पुन्हा कार्यालयात लावला.
डॉ. ह. नि. सोनकांबळे
प. जवाहरलाल नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यासमोर देशातील आनेक समस्या आणि आव्हाने होती. नुकतीच भारताची फाळणी झाली होती, संस्थानाच्या विलीनिकरणाचा प्रश्न होता, निर्वासितांच्या समस्या होत्या, नविन निर्माण झालेल्या राष्ट्राची कायदा व सुरक्षेचा प्रश्न होता, आर्थिक मागासलेपण, सामाजिक मागासलेपण, गरीबी, बेरोजगारी, निरक्षरता, शिक्षण, आरोग्याच्या समस्या, विज्ञान तंत्रज्ञानाचा अभाव अशा कितीतरी बाहय आणि अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न त्यांच्या समोर आव्हान म्हणून उभे होते. पं. जवाहरलाल नेहरुंनी ही आव्हाने सार्थ पणे पेलली. भारताला एका वेगळया उंचीवर नेवून सोडले. परंतु आजकाल राजकारणात आलेली मंडळी हा इतिहास न वाचताच प्रश्न उपस्थित करतात की, नेहरुंनी काय केले? या प्रश्नाचे उत्तर देताना अटल बिहारी वाजपेयीच्या जीवनातला एक किस्सा मला महत्वाचा वाटतो.
अटलबिहारी वाजपेयी 1977 मध्ये परराष्ट्र मंत्री झाले तेव्हा, परराष्ट्र मंत्रालयात प्रवेश करताना त्यांना पूर्वी असलेले पं. नेहरु यांचे भव्य अशा स्वरुपातले तैलचित्र दिसले नाही.
त्यांनी त्या सबंधी अधिकाऱ्यांना विचारणा केली. तेव्हा अधिकाऱ्यांनी ते तैलचित्र काढून टाकल्याचे समजले.
अटलबिहारी वाजपेयी यांनी तेच तैलचित्र त्याच ठिकाणी सन्मानाने लावण्याचे आदेश दिले आणि म्हणाले, ‘आज आपण जगात मान उंच करुन चालू शकतो ते नेहरुंच्या परराष्ट्र धोरणामूळे.’
खरे तर अटल बिहारी वाजपेयी हे नेहरूंचे कट्टर विरोधक होते. 1962 च्या वेळी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान म्हणजेच नेहरूजींवर टीका करण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. पण नेहरू किंवा काँग्रेस त्यांच्यावर कधीही शत्रूसारखी वागली नाही. उलट राज्यसभेची बैठक बोलावण्याची त्यांची मागणी पं.नेहरूंनी मान्य केली. ते राज्यसभेत बोलत असताना त्यांना कोणीही अडवले नाही. नेहरूंवर टीका करत असताना ते म्हणाले कि,
अरुणाचल नेफा (आता अरुणाचल प्रदेश) मध्ये चिनी हल्ल्याचा सामना करण्यासाठी सैन्य सज्ज आहे हे पं.नेहरूंना माहीत होते का?
5 सप्टेंबर आणि 20 ऑक्टोबर रोजी चीनने हल्ला केला. मधल्या काळात भारताने तयारी का केली नाही?
नेफा येथे सीमेवर पहारा देण्यासाठी पुरेसे सैनिक का तैनात केले गेले नाहीत आणि जे तेथे होते त्यांच्याकडे आवश्यक शस्त्रे आणि इतर गोष्टी का नाहीत?
परदेशातून परतल्यानंतर नेहरूंनी चीनसोबतच्या वाढत्या तणावाबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती सर्वांना का दिली नाही..?
मला शंका आहे की सरकारला चीनचा हेतू समजला आहे, अन्यथा युद्धबंदीवर (५ सप्टेंबरनंतर) चर्चा करण्यास सहमती दिली नसती?
असे अनेक प्रश्न वाजपेयींनी नेहरूण सभागृहात विचारले. आज असे प्रश विचारले तर लोक देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतात. पण नेहरू आणि वाजपेयी याना खऱ्याअर्थाने लोकशाही माहित होती म्हणून असा प्रकार कधीच घडला नाही.
आपल्या कामाची पावती विरोधकांनीही द्यावी असा इतिहासच नेहरुंनी निर्माण केला. ज्यांना इतिहास वाचण्याची सवयच नाही त्यांना हे सर्व कळणार तरी कसे म्हणा.
अशाच प्रकारचे राजकीय किस्से वाचण्यासाठी या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका.
लेखक , एमजीएम विद्यापीठ औरंगाबाद येथे राज्यशास्त्र व शासन विभागात सहाय्यक प्राध्यपक आहेत.
No comments:
Post a Comment