Tuesday, June 30, 2020

रोमँटिक हिटलर




कट्टर धार्मिक, हिंसक, क्रूर अशी कायम ओळख आपल्या मनात निर्माण करणारा हिटलर अतिषय भित्रा, प्रेमळ, कवी मनाचा "रोमँटिक" होता असे म्हटले तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत.




 पण हे खरे आहे की, तारुण्याच्या काळात हिटलर नेमका असाच होता. ऐन तारुण्यात तो स्टेफन नावाच्या तरुणीवर एकतर्फी प्रेम करायचा. हिंदी चित्रपटातील नायकाने आपल्या प्रेयसीच्या घराच्या भोवती चकरा माराव्यात तसा तो नेहमी तिच्या भोवती फिरायचा. 



1969 च्या "प्यार हि प्यार" चित्रपटात धर्मेंद्र जसा वैजयंतीमाला ला पाहून म्हणतो की, मै कहीं कवी ना बन जाऊ तेरे प्यार मे ए कविता, किंवा "बॉबी" चित्रपटात ऋषी कपूर डिंपल कापडियाला म्हणतो, मै शायर तो नहीं... अगदी तशीच अवस्था या हिटलरची स्टेफन ला बघून झाली होती. 



तो तिच्यावर एवढे प्रेम करायचा कि त्याने नंतर तिच्यावर कविताही केल्या. पण प्रेमळ असलेला हिटलर भित्राही होता. त्यांनी तिच्यावर लिहलेली एकही कविता तिच्यापर्यंत पोहचवली नाही. त्याचे प्रेम शेवटपर्यंत एकतर्फी राहिले. 


तो जितका प्रेमळ होता तितकाच तो विश्वासूही होता. पुढे ब्राऊन नावाच्या तरुणीशी त्याचे 10 वर्ष प्रेम संबंध राहिले. त्याने तिला लग्नाचे आश्वासनही दिले होते. पण तसा काही योग येतच नव्हता. जेव्हा त्याला असे कळले की, आपले आयुष्य आता संपणार आहे त्याच्या एक दिवस आगोदर त्याने ब्राऊनशी विवाह केला आणि तिला दिलेला शब्दही पाळला. 


1919 मध्ये केवळ 111 लोकांच्या समोर हिटलरने पहिले 30 मिनिटांचे भाषण केले आणि त्याला त्यांच्यातले नेतृत्वगुण समजले. अशा या हिटलरने जगाला मोठे हादरे दिले. हिटलर ची सुरुवातीची ओळख नंतरच्या काळात मात्र राहिली नाही. 

Friday, June 26, 2020

"जातीसाठी माती" न खाणारा राजा





"जातीसाठी माती" न खाणारा राजा
डॉ. ह. नि. सोनकांबळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकवेळेस गांधीजींना म्हणाले हिते कि, गांधीजी लेखणीच्या एका फाटकाऱ्याने कोणताही समाज बदलता येत नाही.  (प्रा. डॉ. श्रीराम निकम लिखित "गांधी-आंबेडकर अस्पृश्यता मुक्ती संघर्ष" या पुस्तकात या घटनेचे वर्णन खूप विस्ताराने आले आहे. ) कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास डोळ्यांनी बघितला होता आणि त्याचे चिंतनही केले होते. कितीही कडक कायदे केले तरी लोक जातीसाठी माती खतातच हे त्यांना माहीतच होते. पण शाहू महाराज हे जातीसाठी माती खाणारे राजे नाहीत हि बाबच शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मैत्री घनिष्ठ करत गेली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर शाहू महाराजांनी 1919 ला केलेला अस्पृश्यता बंदीचा कायदा होता. हा कायदा होऊनही सार्वजनिक विहिरीचे पाणी बाटवले म्हणून "गंगाराम कांबळे" यांना मारहाण झाली. पण शाहू महाराजांनी जातीसाठी माती कधीच खाल्ली नाही. ज्या लोकांनी गंगाराम कांबळे यांना मारहाण केली त्या लोकांना दरबारात पकडून आणले आणि त्यांना चाबकाने सोलून काढले. 

गंगाराम कांबळे याला बोलावून घेतले आणि त्याला व्यवसाय करण्याचा सल्ला शाहू महाराजांनी दिला. आज जे लोक तुला अस्पृश्य समजत आहेत तेच लोक उद्या तुझ्या हॉटेल ला येऊन तुझ्या हातचा चहा पितील. असा ठाम विश्वास त्यांनी गंगाराम कांबळे यांना दिला. 

Advt.


शाहू महाराजांनी त्यांना सहकार्य केले, प्रेरणा दिली. एवढेच नाही तर ते फेरफटका मारायला गेल्यावर त्या हॉटेल मध्ये जाऊन आपल्या सोबत फिरणाऱ्या इतर जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्या हॉटेल वर बसून चहा पिऊ लागले. हि घटना इतिहासात जरी शाहू महाराजांनी अस्पृश्यांना व्यवसाय सुरु करुन दिले एवढ्यापुरती मर्यादित नाही किंवा अस्पृश्याच्या हातचा चहा शाहू महाराज पित असत एवढयापूरतीही मर्यादित नाही. 

हि घटना आपल्याला राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देते. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे सारख्या प्रवाहाच्या बाहेरच्या व्यक्तीला प्रवाहात आणले. जो पर्यंत प्रत्येक व्यक्ती प्रवाहात येत नाही तोपर्यंत या देशाचे आपल्याला राष्ट्र उभे करता येणार नाही याची जणीव शाहू महाराजांना होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील हाच मुद्दा उपस्थित करून या देशाला "राष्ट्र" म्हणता येणार नाही असे स्पष्ट पणे सांगितले होते. कारण हा देश जाती जाती मध्ये विभागलेला असून प्रत्येक एक जात हि स्वतःला "राष्ट्र" समजते, त्यामुळे ते कधीच एक होऊ शकत नाहीत. तर, जो पर्यंत लोक एकमय होत नाहीत तोपर्यंत आपल्याला कोणत्याही देशाला राष्ट्र म्हणता येणार नाही असे महात्मा फुले म्हणतात.

भारतातील लोकांना एकमय होऊ न देण्यासाठी "जात" आडवी येते त्यामुळे तीला कायमचे नष्ट करणे आवश्यक आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटते. जातीला संपवायचे असेल तर आपापसात व्यवहार होणे तितकेच आवश्यक आहे याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही ते सांगतात. शाहू महाराजांनी 1917 ला आंतरजातीय विवाहाचा कायदा करून आणि गंगाराम कांबळे यांना हॉटेलचा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा देऊन जाती-जाती मधील व्यवहारालाच प्रोत्साहन दिले. महात्मा फुले ज्यापद्धतीने सांगतात की, लोक एकमय झाले पाहिजेत, त्याच दिशेने शाहू महाराज पावले टाकताना दिसतात. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या कृतिकार्यक्रमाला पुढे घेऊन जातात आणि आपल्याला या देशाचे "राष्ट्र" निर्माण करायचे आहे असे पुढच्या पिढीला सांगतात. 

पण आजही असे अनेक लोक आहेत जे फुले, शाहू आणि आंबेडकरांचा हा विचार सोडून जातीसाठी माती खायला निघतात. पण त्यांनी किमान, "जातीसाठी माती खावी पण कुठली खावी याचेही भान ठेवावे."

हेही वाचा 




T to translated by Google for English reader. 

King who does not eat "soil for caste"
Dr. H. N. Sonakamble

Dr. Babasaheb Ambed Ambedkar kar once said to Gandhiji that no society can be changed by a single piece of Gandhiji's writing.(This incident is described in great detail in the book "Gandhi-Ambedkar Untouchability Liberation Struggle" written by Prof. Dr. Shriram Nikam.) Because Dr.Babasaheb Ambedkar had seen history with his own eyes and had also thought about it. No matter how strict the laws were, they knew that people were only cultivating the soil for the caste. But Shahu Maharaj is not a king who eats soil for the sake of caste. Babasaheb Ambedkar's friendship grew closer. 

Dr. In front of Babasaheb Ambedkar, Shahu Maharaj's Untouchability Act of 1919 was a law. Despite this law, "Gangaram Kamble" was beaten up for distributing water from public wells. But Shahu Maharaj never ate soil for caste.The people who had beaten Gangaram Kamble were caught in the court and whipped. 

Gangaram Kamble called him and Shahu Maharaj advised him to do business. The same people who consider you untouchable today will come to your hotel tomorrow and drink your handful of tea.He gave such firm faith to Gangaram Kamble. 

Shahu Maharaj supported and inspired him. Not only that, when he went for a walk, he went to the hotel and sat down at the hotel and drank tea with the people of other castes who were walking with him.This incident is not limited to the history in which Shahu Maharaj started a business for the untouchables or the tea in the hands of the untouchables was drunk by Shahu Maharaj. 

This incident inspires us to build a nation.Shahu Maharaj brought an out-of-stream person like Gangaram Kamble into the stream. Shahu Maharaj was aware that we cannot build a nation of this country unless every person comes into the stream. Dr. Babasaheb Ambedkar also raised the same issue and made it clear that this country cannot be called a "nation". Because this country is divided into castes and each caste considers itself a "nation", so they can never be one.So, Mahatma Phule says that no country can be called a nation unless the people are united.

The "caste" is horizontal in order to prevent the people of India from uniting, so it needs to be eradicated forever.Babasaheb Ambedkar thinks. He also said that if caste is to be eradicated, it is necessary to make efforts for mutual treatment. Shahu Maharaj encouraged inter-caste marriage by enacting the Inter-caste Marriage Act in 1917 and inspiring Gangaram Kamble to start a hotel business. Shahu Maharaj is seen taking steps in the same direction as Mahatma Phule says that people should be united.Next Dr. Babasaheb Ambedkar takes the work of both of them forward and tells the next generation that we want to create a "nation" of this country. 

But even today, there are many people who abandon the idea of ​​Phule, Shahu and Ambedkar and go out to eat soil for the sake of caste. But he should at least say, "Eat soil for caste but also be aware of what to eat."



Friday, June 19, 2020

"मिलिंद विद्यापीठ" का झाले नाही ?





सर सय्यद अहमद खान यांनी 1875  ला स्थापन केलेल्या मुस्लिम अँग्लो ओरियन्टल कॉलेज चे रूपांतर 1920 मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठात झाले. तर अँनि बेझन्ट व मदन मोहन मालवीय यांनी 1898 मध्ये स्थापन केलेल्या सेंट्रल हिंदू महाविद्यालयाचे रूपांतर नंतर हिंदू बनारस विद्यापीठात झाले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन संस्थेचे किंवा मिलींद महाविद्यालयाचे रूपांतर नंतर मिलिंद विद्यापीठात होऊ शकले नाही. 

एकीकडे मुस्लिम विद्यापीठ तर दुसरीकडे हिंदू विद्यापीठाची स्थापना होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या लोकांचा विचार करत होते. जर शैक्षणिक संस्था अशा धर्माच्या नावावर उभ्या राहत असतील तर भारतातल्या लोकांचे काय होईल हि चिंता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होती. भारतातील "लोक" आणि त्यांचे कल्याण हा विषय त्यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू होता. म्हणून त्यांनी "लोक" हि संकल्पना लक्षात घेऊन "पीपल्स" एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. कदाचित बाबासाहेबांना या देशात कोणत्याही धर्माच्या नावाने शिक्षण संस्था असाव्यात हि संकल्पनाच मान्य नसावी म्हणूनच त्यांनी भविष्यात "पीपल्स युनिव्हर्सिटी" स्थापन व्हाव्यात या दृष्टीकोनातून संस्था स्थापन केल्या. या देशाच्या भूमीत जे विद्वान लोक जन्माला आले त्यांची नावे विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना असावीत असे त्यांना वाटत होते. म्हणूनच त्यांनी विद्वान असलेल्या राजा मिलिंद चे नाव महाविद्यालयाला दिले. कोणत्याही संस्था, विद्यापीठे जातीच्या आणि धर्माच्या नावाने न ओळखता त्यातील शिक्षकांच्या  आणि विद्यार्थ्यांच्या नावाने ओळखली जावीत असा त्यांचा निश्चय होता. त्यासाठीच त्यांनी आपल्या संस्थेला नागसेन आणि मिलिंद या गुरु शिष्याचा वारसा सांगितला. इथून पुढेही हा वारसा निर्माण होत राहील हीच त्यांची अपेक्षा होती. 

खरे तर आजपर्यंत हे संस्थान एक मोठे विद्यापीठ होणे अपेक्षित होते पण ते झाले नाही. त्यानंतर अनेक संस्था उदयास आल्या आणि त्यांची विद्यापीठे निर्माण झाली पण संस्थेच्या ट्रस्टींनी त्या दृष्टीने पाऊले टाकली नाहीत. आजही संस्थेचा मालक कोण? यावर वाद सुरू आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळातही या संस्थेची वाटचाल कशी राहील हा चिंतेचा विषय आहे. 

मुळात या संस्थेचा वारस कोण? यावर मोठे वाद सुरु आहेत. अनेकांचे म्हणणे असे आहे की, " माझ्या संस्थेवर माझ्या रक्ताचा कोणीही वारस असणार नाही." अशी अपेक्षा बाबासाहेबांची होती.  याच वाक्यावरून  ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना दूर ठेवण्यात येत आहे. मुळात प्रश्न असा आहे की,  "जर उद्या एखाद्याला  संस्थेचा सदस्य म्हणून नेमायचे असेल तर त्याच्याकडून बॉण्ड वर असे लिहून घ्यायचे का कि, "मी बाबासाहेबांच्या रक्ताचा वारस नाही." असा कोणता अनुयायी असेल की तो असे लिहून देईल. आणि असे लिहून देणारा संस्थेचा काय विकास करू शकेल. त्यामुळे अशा बाबींचा अडथळा पुढे न करता सरळ ऍड. बाळासाहेब आंबेडकरांचा मार्ग मोकळा करून संस्थेचा ताबा त्यांना देण्यात यावा व सर्व सदस्यांनी या संस्थेच्या विकासाचा श्वास मोकळा करावा. 

महाराष्ट्राच्या विकासात या संस्थेचे योगदान सुरुवातीपासूनच मोठे राहिलेले आहे. त्यामुळे असे अनेक हात आहेत की ते या संस्थेच्या मदतीस धावून येतील. महाराष्ट्रातील लोक, राज्यसरकार आणि केंद्रसरकार यातील कोणीही या संस्थेच्या विकासास अडथळा निर्माण करणार नाही. आजपर्यंत सरकारची भूमिका देखील सकारात्मक राहिलेली आहे. अनेक लोक या संस्थेला मदत करायला तयार आहेत. मागे 12 जानेवारी 2017 ला माझी भेट मा. खा. सुप्रिया ताई सुळे यांच्यासोबत झाली होती. संस्थेच्या बाबतीत त्यांनी सहज विचारलं. विद्यार्थ्यांची कशी सोय आहे हे हि विचारलं. वसतिगृहाची अवस्था बिकट आहे, खूप पडझड झाली आहे. यावर चर्चा झाली. मला वाटलं सहज विचारलं असेल. पुढे दोन दिवसानंतर म्हणजेच 14 जानेवारी 2017 ला त्यांनी मिलिंद कॅम्पस चा दौरा केला आणि वसतिगृहाची पाहणी केली. वसतिगृहाची अवस्था बघून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या लक्षात आले. संस्थेत वाद सुरू असल्याने वसतीगृहाचा विकास करता येत नाही हि बाब लक्षात घेऊन  त्यांनी "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान" कडून दीड कोटी ची मदत जाहीर केली. पुढे तोच प्रश्न मध्ये आला संस्थेचा वाद. 

असे किती तरी लोक आहेत जे या संस्थेचा विकास करू पाहत आहेत पण जोपर्यंत संस्थेचा वाद संपुष्टात येणार नाही तो पर्यंत विकासाचा रथ अडून राहणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना केंद्र म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हि संस्था उभी केली त्याच लोकांनी आता नव्याने काही पाऊले उचलने आवश्यक आहे. जोपर्यंत एखादी खंबीर व्यक्ती इथे येणार नाही तोपर्यंत लोकांचं अर्थात "मिलिंद विद्यापीठ" स्थापन होणार नाही. 

Wednesday, June 17, 2020

चीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून






चीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून  

डॉ. ह. नि. सोनकांबळे

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, चिन पंचशिलाचे पालन कधीच करणार नाही म्हणून चिनसोबत मैत्री करत असताना भारताने सावध पवित्रा घ्यावा. या दूरदृष्टीने  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत चिन सबंधाचा विचार केला होता. आता तर "स्ट्रिंग आॅफ पर्ल्स" आणि "चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर" च्या माध्यमातून संपुर्ण भारतालाच चिनने घेरले आहे. असे असतानाही  भारताचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी  चिनचा  दौरा केला.  पं. नेहरुपासून ते आजपर्यंत भारताची भूमिका पंचशिलाप्रमाणे राहिली आहे. परंतु आता तरी भारत चिनला जशास तसे उत्तर देईल का? याकडे सगळयांचे लक्ष लागले असते. 




. खरे तर बुद्धाची भूमी हीच भारताची जागतीक ओळख असून प्राचिन काळापासून भारताचा शेजारील राष्ट्रांशी  सांस्कृतीक सबंध जोडला गेला आहे. तथागत बुद्धांनंतर फाहियान सारखे अनेक चिनी प्रवाशी भारतात आले आणि बुद्धाच्या या भुमीचा अभ्यास करुन जगभरात तथागत गौतम बुध्दच उपदेष त्यांनी पोहचवला. इतकेच काय तर नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठाचे माॅडेल जगाला देणारा भारत हा एकमेव प्राचिन देश असल्याने अनेक देशातील विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असत आणि या देशातील बुद्धाची शिकवण ते आपल्या मायदेशि परत गेल्यावर आपल्या देशाला देत असत. म्हणूनच आज भारताविषयी अनेक देश आदर बाळगून असतात. परंतु याचा विचार प्रकर्षाने पुढे येत नाही. आज भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलायचे झाले तर केवळ आर्थीक कारणापुरते बोलले जात आहे. परंतु बुद्ध कालखंडात भारताचा व्यवहार इतर देशासोबत कसा होता याचा विचार आज होताना दिसत नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा धरुन भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार मांडला होता. अनेकांना असा प्रश्न्न पडतो की, परराष्ट्र धोरणाशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा काय सबंध आहे. कारण सर्वांना आजपर्यंत भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जनक पं. नेहरु आहेत हेच शिकवले गेले आहे. परंतु त्यांचे परराष्ट्र धोरण कसे चुकीच्या दिशेने जात आहे, हे सांगणारे तत्कालीन मंत्रीमंडळात एकमेव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होते असे न्यूयाॅर्क टाइम्स ने सुद्धा स्पष्टपणाने मांडल्याचे संदर्भ आहेत. 



एकीकडे भारत स्वतंत्र होत असताना दुसरीकडे चीनमध्ये गृहयुद्ध सुरु होते हे आपल्या सर्वानाच माहित आहे. त्याचबरोबर चीन आपले वर्चस्व UNO मध्ये देखील निर्माण करू पाहत होता. जेव्हा चीन ला UNO च्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व देण्याचा विषय पुढे आला तेव्हा भारताने चीनला पाठिंबा दिला आणि चीन ला स्थायी सदस्यत्व मिळवून देण्यासाठी भारताने प्रयत्न केले. भारतामुळे चीन UNO च्या पाच प्रमुख राष्ट्रात जाऊन बसला. भारताला असे अपेक्षित होते की याचा फायदा भविष्यात कधी ना कधी आपल्याला होईल. पण अशी वेळ अजून तरी आली नाही. उलट जेव्हा कश्मीर चा विषय UNO मध्ये गेला तेव्हा चीन ने भारताच्या विरोधात नकाराधिकाराचा वापर केला.  रशियाने भारताच्या बाजूने आपली भूमिका मांडली. 



UNO मध्ये चीनला पाठींबा देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केला. ते म्हणाले की, नेहरूंनी चीनला पाठींबा देत बसू नये, चीन या उपकाराची जाणीव कधीच ठेवणार नाही. म्हणून नेहरूंनी भारताला UNO च्या सुरक्षा परिषदेत कसे स्थान मिळवता येईल याचा विचार करावा. बाबासाहेब तेव्हा जे काही सांगत होते ते भविष्यात खरे होत गेल्याचे दिसते. चीनने भारतामुळे सुरक्षपरिषदेत स्थायी सदस्यत्व मिळवले पण या उपकाराची जाणीव आजूनही चीनला नाही. भारताने स्वतःला स्थायी सदस्यत्व मिळवण्याचा विचार तेव्हा मांडला आजूनही आपण त्या ताकदीने प्रयत्न करत नाही. 

भारत चिन सबंधावर  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष लक्ष होते. त्यांनी चिनच्या आणि भारताच्या हालचाली अचूक पणे अभ्यासल्या होत्या म्हणूनच त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण भारत चिन सबंधातील महत्वाची बाब म्हणजे 1954 ला या दोन देशात पंचशील  करार करण्यात आला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धम्मावर आणि पंचशीलावर अतिशय प्रेम होते तरी त्यांनी या करारावर टिका केली. कारण पंचशीलाचे आचरण चिन करत नाही असे त्यांचे म्हणने होते. हे सांगत असताना ते म्हणतात की,  आंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशीलाला जागाच नसते व कम्युनिष्ठ  देशांत तर मुळीच नसते बौद्ध  धम्मात जरी पंचशिलाला महत्व असले तरी चीनच्या माओनी पंचशीलाचे आचरण आगोदर चीनमध्ये करावे. अशि  सडेतोड भूमिका घेताना बाबासाहेब दिसतात. आणि चिनपासून सावध राहण्याचा इशारा देखिल बाबासाहेब तात्कालीन परिस्थितीत देतात.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा तो इशारा 1962 पासून आजपर्यंत खरा ठरताना दिसतोय. भारताने चीनसोबत पंचशील करार करुन मैत्री केली असली तरी आजपर्यंत ही मैत्री नेहमी संशयाच्या भोवऱ्यात आडकली आहे. भारतात सत्ता बदलानंतर अनेक देशाचे दौरे करुन आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे चीनच्या दौऱ्यावरही जाऊन आले. भारत जरी नेहमी चिनसोबत मैत्रीची भाषा करत असला तरी चिनने मात्र नेहमीच भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आजही ते लडाख येथील चुमार मधून, डोकलाम मधून घुसखोरी करत असताना दिसतात. भारताने आपले संपुर्ण लक्ष उत्तर भारताकडे लावून ठेवावे म्हणून ते नेहमी अशा छोटया छोटया कसरती करत असतात. आणि भारत ताठर भूमिका न घेता नेहमीच पंचशीलाचे पालन करत शांत राहण्याचे काम करत आला आहे. भारताने काही दिवसापुर्वी व्हिएतनाम मध्ये  तेल साठे शोधायला सुरुवात केली तेव्हा चिनला हे सहन झाले नाही आणि वाद होवू नयेत म्हणून येथे तेल सापडत नसल्याचे कारण पुढे करुन भारताने तिथली शोधमोहिम थांबवली. त्याच्या काही दिवसानंतर तीन बेटावरुन चिन आणि जापान मध्ये वाद सुरु झाले आणि चिनने जपानला भारतप्रमाणे वागणूक देण्याचा प्रयत्न केला मात्र जापान न डगमगता चिनच्या विरोधाला तोंड देत राहीला शेवटी चिनलाच नमते घ्यावे लागले. भारताला जर खरेच चिनला मागे टाकून जगाची महासत्ता व्हायचे असेल तर जपान प्रमाणे ताठर भूमिका घ्यावी लागणार आहे. साऱ्या भारताला सर्व बाजूने घेरण्याचे काम चिन सातत्याने करतो आहे. स्ट्रिंग आॅफ पर्ल (मोत्याची माळ), चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर  या चिनच्या नवीन नितीने श्रीलंका आणि पाकिस्तानच्या मदतीने भारताला समुद्री मार्गाने आणि pok कडून  घेरले आहे. बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, ओमन, इरान आणि खाली केनिया पर्यंत ही मोत्याची माळ पसरली आहे. 


  हेे स्ट्रिंग आॅफ पर्ल्स म्हणजे नेमके काय आहे? तर भारताच्या आजूबाजूची सर्व बेटे आपल्या ताब्यात घ्यायचे, त्याचा काही दिवस व्यापारासाठी वापर करायचा आणि तदनंतर तेथे सैनिक तळ उभे करायचे हा कार्यक्रम गेली अनेक वर्षपासून चिनने सुरु केला आहे. आज अशी सोहळा बेटे चिनच्या ताब्यात आहेत.  श्रीलंका आणि पाकिस्तानला मदतीचे आमिश दाखवून त्यांची ही बेटे चिनने ताब्यात घेतले आहेत. म्हणून भारताला केवळ उत्तर भारताकडे लक्ष केंद्रित करुन चालणार नाही. तर दक्षिण भारताच्या सिमेवर देखिल सैनिकी तळ उभे करावे लागणार आहे. सध्या भारताचा चेन्नई येथे महत्वाचा तळ उभा राहिला आहे. असे अनेक तळ भारताला उभे करावे लागणार आहेत. शिवाय चिनला जर नियंत्रणात ठेवायचे असेल तर भारताला भविष्यात जपान, अमेरिका, आॅस्ट्रेलिया आणि रशियासोबत मैत्रीपुर्ण व्यवहार वाढवावे लागणार आहेत. ज्याप्रमाणे चिन भारताला घेरतो आहे त्याचप्रमाणे आॅस्ट्रेलिया आणि जपान देखिल चिनला घेरण्याची योजना आखत आहेत या कामात त्यांना भारताची मदत हवी आहे. म्हणूनच भारताने भविष्यात पंचशिलाचा विचार न करता चिनला कसे रोखता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे. जोपर्यंत चिन पंचशिलाचे पालन करणार नाही तोपर्यंत भारताने देखिल चिनला जशास तसे उत्तर दयावे. जर भारत नेहमीच नमती भूमिका घेत राहीला तर भारताला पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणीस्तान, चिन या सर्वच देशाला तोंड देत बसावे लागेल आणि भारताच्या चोहिकडील सिमा धोक्यात येतील.

चिनसोबत आपले वर्तन कसे असावे याचा आढावा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा नेहरुंना समजावून सांगितला होता परंतु याकडे आजूनही सरकारने लक्ष दिले नाही. भारताच्या दक्षिण बाजूने गुंफलेली मोत्याची माळ (स्ट्रिंग आॅफ पर्ल) दक्षिणेकडून भारतावर कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही आणि हे हल्ले कसे रोखायचे याचे नियोजन भारताकडे अद्यापतरी नाही. भारत नेहमीच परराष्ट्र धोरण आखत असताना अतिचांगुलपना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, हा अतिचांगुलपणा परराष्ट्र धोरणात काही कामाचा नसतो. चिनसोबत नेहरुंनी अतिचांगुलपना दाखवू नये हे एक दिवस महागात पडेल. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची ही दूरदृष्टी आजूनही आपण समजून घेत नाही. जोपर्यंत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे परराष्ट्र धोरण, त्यांची दूरदृष्टी आपण समजून घेत नाही. तोपर्यंत तरी आपण चिनसारख्या राष्ट्रावर  मात करुन महासत्तेचे स्वप्न बघू शकत नाही.  

ब्लॉग आवडल्यास ब्लॉग ला Follow करायला विसरू नका. 

India china war 2020, India China war 1962, India China war 1972, India china international relation, India china relations and Dr. B. R. Ambedkar, India china relations and nehru, India china relations and Narendra Modi. 

Monday, June 15, 2020

बेबी को "जात" पसंद है।



कोणताही व्हायरस, कोणतंही महायुद्ध किंवा कोणतंही नैसर्गिक संकट भारत या देशाचे काहीही बिघडवू शकत नाही. पण आम्ही स्वतः या देशाला, देशाच्या एकतेला संपवणारा शत्रू हजारो वर्षापासून आमच्या सडक्या मेंदूत आणि आमच्या खानदानी परंपरेनुसार घरातच पाळून ठेवलाय. यात सुशिक्षित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जात हिच आता त्यांची प्रेरणा बनत चालली आहे. अशा लोकांच्या मेंदूत हा शत्रू 24 तास कार्यरत असतो तर काहींच्या गरजेनुसार जागा होतो. पण काही लोक असेही आहेत की त्यांनी हा शत्रू कायमचा तर काहींनी वेळेनुसार संपवण्याचा प्रयत्नही केला आहे. 


भारत हि खरी तर संतांची आणि महंतांची भूमी आहे. पण त्यांची परंपरा चालू राहिली नाही आज त्यांच्याऐवजी सोशल मीडियावर "संता- बंता" च्या जोड्या जन्माला आल्या आणि समाज सुधारणेचे अखंड, काव्य, गाथा निर्माण करण्याऐवजी सामाजिक तेढ निर्माण करणारे पांचट जोक निर्माण करू लागल्या. काही काही लोकांनी तर पायात पैंजण बांधून टिक टॉक वर छम छम करायला सुरुवात केली. (यावरून असंच वाटतं की TiK-Tok ला मराठीत "छम-छम म्हणायला हरकत नाही.) आणि हेच संता- बंता "नाचे" झाले आणि जात नावाचा शत्रू घेऊन सोशल मीडियावर नाचू लागले. याना बघणारे लोक, लाईक करणारे लोक इतके हुशार असतात की, ते दिवसभर त्यावरच असतात आणि स्वतःला राजदरबारात बसल्याचा फील आणून या सर्वांना नाचताना बघतात. याना असं वाटतं की, हे सर्व "नाचे" आपण ठेवलेलेच आहेत. ते त्यांना दिवसभर एक बोटाने डिवचू डिवचू नाचवतात. आवडला नसला कि त्याच बोटाने टच करून पुढे सरकवतात. इतकं एक बरं आहे की, ते त्यांच्या दरबारात फेटे उडवू शकत नाहीत, शिट्या वाजवू शकत नाहीत आणि पैसे उधळू शकत नाहीत. पण हा प्रकार असाच राहिला तर आपल्या "जातीच्या" "नाच्यावर" ते नक्की हे सर्व करतील. कारण जातीचा अभिमान बाळगून "छम-छम" केलं की तो त्या जातीचा "छम-छम स्टार" होतो आणि त्या जातीच्या ग्रुप मध्ये तो इतका व्हायरल होतो की, ज्यांचा जाताभिमान झोपला होता तो लगेच जागा होतो. हा जागा झालेला जाताभिमान समाजात सुसाट तेढ निर्माण करत सुटतो. सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की हा स्टार   "बेबी को बेस पसंद है" या गाण्यावर नाचत आहे पण पुढे ती "बेबी को "जात" पसंद है! या गाण्यावर नाचताना दिसतो.


मग याला आवरता आवरता शासन, प्रशासन, प्रबोधनकार, सामाजिक चळवळीतील लोक आणि कितीतरी चांगले लोक कामाला लागतात. पण या "छम-छम स्टार" ने एवढी घाण करून ठेवलेली असते आणि ती इतक्या लोकांनी खाल्लेली असते की लोक मानसिकसंतुलन गमावून बसलेले असतात. याना आवरता आवरता आपली अनेक वर्षे निघून गेली आहेत. पण यातून बरे होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे कारण त्या त्या समाजात अनेक डॉकटर निर्माण होत आहेत आणि समाजाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काही लोक इंजेक्शन च्या भीतीने त्यांच्या जवळ येत नाहीत तर काहीजण गोळ्या खिडकीतून फेकुन देत आहेत. त्यामुळे या आजारातून बरे होण्याच्या प्रमाणात अतिशय मंद गतीने प्रगती होत आहे. 


पण यातूंन लोक नक्कीच बरे होतील असा आशावाद डॉ. बसवेश्वर महाराज, डॉ. संत तुकाराम महाराज, डॉ. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. राजर्षी शाहू महाराज, डॉ. प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक तज्ञ डॉकटरांनी व्यक्त केला होता. त्यांच्या या आशवादास त्यांच्या विचारांवर आणि मार्गदर्शनावर काम करणाऱ्या अनेकांनी हे काम चालू ठेवले आहे. पण देशाची लोकसंख्या ज्यास्त असल्यामुळे त्यांना शोधून काढून त्यांच्यावर विलाज करणे इतके दिवस अवघड जात होते पण आता tik tok अर्थात छम छम मुळे थोडे  सोप्पे झाले आहे. त्यांचा विलाज करण्यासाठी त्यांना आगोदर विजेचे शॉक द्यावे लागतील का याच्यावर शासन आणि पोलीस यंत्रणा येणाऱ्या काळात नक्कीच विचार करेल. पण प्रश्न असा आहे की शासन आणि पोलीस यंत्रणेतील असे मानसिक आजाराने ग्रस्त असणारे आगोदर शोधून बाहेर काढावे लागतील. त्यांचा आगोदर बंदोबस्त करावा लागेल. त्यामुळे सरकार समोर हे एक मोठे आव्हान आहे. पण अशा लोकांना शोधणं आता काही अवघड काम नाही. एखादा व्यक्ती आरोपी आहे असे सर्वाना माहित असताना जर त्याची बाजू घेऊन तुमच्या एरियातला खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक,  इतर राजकारणी किंवा शासन आणि प्रशासनातील एखादा कर्मचारी अधिकारी  पुढे आला तर त्याची नोंद यात करायची आणि त्याला सुरुवातीला उपरोक्त डॉकटरांनी सांगितलेले प्राथमिक औषधे द्यायची.सहा महिन्यात तो बरा नाही झाला तर त्याच्या घरच्यांना सांगून घरीच निगराणीखाली ठेवण्याचा सल्ला द्यायचा. 


हे असे रोगी जोपर्यंत निट होत नाहीत तो पर्यंत आपल्याला 24 तास काम करावे लागेल. तेव्हाच कुठे आपला देश भविष्यात एक राष्ट्र म्हणून पुढे येईल. तेव्हा मित्रहो आजपासून सुरुवात करा आपल्या शेजारी,  परिवारात, मित्र परिवारात असा कोणी "छम-छम स्टार" असेल तर त्याला डॉ. बसवेश्वर महाराज, डॉ. संत तुकाराम महाराज, डॉ. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. राजर्षी शाहू महाराज, डॉ. प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा तज्ञ डॉक्टरांच्या पुस्तकाची रोज एक एक पाने सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशी तीन वेळ चघळायला द्या. यातून त्यांच्या मेंदूला पोषक तत्वे भेटतील आणि रोगी लवकर बरा होईल. पालकांना आणि कुटुंब प्रमुखांना विनंती करा की, त्यांच्या कुटुंबात जर कोणी असा "छम-छम स्टार" असेल तर त्याच्या पायातले पैंजण काढून फेकून द्या. या पैंजनाच्या ओझ्याने मुलांच्या टाचा दुखतात आणि त्याच्या वेदना चेतापेशी द्वारे मेंदूपर्यंत जातात आणि मेंदू खराब होतो. तेव्हा आजच आपल्या मुलावर लक्ष ठेवा त्याच्या मोबाईल मध्ये असलेले Tik-tok अर्थात छम-छम चे ऍप डिलीट करा. याने तुमचं लेकरू बिघडत चाललं आहे आणि ते देशाला बिघडवत आहे. लक्षात ठेवा मोबाईल बिघडला तर दुसरा घेता येईल किंवा त्याला दुरुस्त करता येईल. पण लेकरू बिघडलं तर....! आणि देशच बिघडला तर....दुसरा देश?


ज्यांना जात पसंद नाही त्यांनी शेअर करा, कमेंट करा. आपल्या एका शेअर ने कोणाचे तरी प्राण वाचू शकतात, कुटुंब सुधारू शकते. चला तर उपरोक्त डॉक्टरांचे हे  अभियान राबवू या जातीच्या मानसिक रुग्णांना बरे करूया. 

#माझा भारत - जातमुक्त भारत 

डॉ. ह. नि. सोनकांबळे

टीप: जे खरोखरच आपली कला सादर करतात तेच खरे स्टार आहेत. बाकी सर्व छम छम आहे. 

#tiktok #Castefreeindia #castefreemaharashtra #annihilationofcaste #mahatmabhaveshwar #chatrapatishivajimaharaj #mahatmaphule #rajarsgishaumaharaj #drbabasahebambedkar 

Wednesday, June 10, 2020

ये दाग अच्छे नहीं है। : मा. शरद पवार साहेबांना अनावृत्त पत्र - डॉ. ह. नि. सोनकांबळे





प्रति, 
मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब, 
अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, 
महाराष्ट्र. 


सस्नेह जय भीम,

आपला पक्ष 21 वर्षाचा झाला त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो. या पक्षाचा आणि पक्षाच्या नेत्यांचा इतिहास येणाऱ्या काळात लिहला जाईल. मागच्या 21 वर्षात पक्षाने काय गमावले आणि काय कमावले याचे चिंतन झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच जे चांगलं काम आहे त्याचं कौतुक या इतिहासात नक्कीच असेल. पण जे वाईट केलं त्याची चर्चाही या इतिहासाचा दुसरा भाग असेल. कार्यकर्त्याने लोककल्याणाची कामे करावीत आणि आपल्या नेत्याला अमर करावे ही आपेक्षा सर्वच नेत्यांची असते. पण कार्यकर्त्याने गुन्हे करावेत आणि त्यातून साहेबांनी आम्हाला सोडवावे हि अपेक्षा कार्यकर्त्यांची असते. त्याशिवाय त्यांना डेरिंगबाज नेता बनता येत नाही. आणि सर्रास आजकाल सत्तेचा उपयोग आपल्या कार्यकर्त्यांना गुन्ह्यातून मुक्त  करण्यासाठी केला जातो. यातून न्यायल्याबाहेर एक "न्यायव्यवस्था" निर्माण होत चालली आहे. पोलीस स्टेशन वर दबाव, अन्यायग्रस्ताचे दमन, गरिबांची लूट, पक्षाच्या नावावर खंडणी आणि प्रचंड भ्रष्टाचार यासाठी संवैधानिक शक्तीचा वापर सर्रास चालू आहे. कोणतेही सरकार आले की, त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते मोकाट सुटतातच कारण त्यांचा कोणीतरी भाऊ, दादा, साहेब, बॉस हा या सत्तेचा भाग असतो आणि तो पोलीस पाटलापासून ते एसपी पर्यंत सर्वाना सांभाळून घेतो. एखादा अधिकारी इमानदारीने काम करत असेल आणि तो भाऊ, दादा, साहेब आणि बॉस ला जुमानत नसेल तर हे भाऊ सरळ त्या अधिकाऱ्याला "मोठ्या साहेबांना सांगू का? तुझी बदली करतो दोन दिवसात" अशा धमक्या देतात. असे कितीतरी प्रकरण साहेबांचे नाव सांगून खाली चालू असतात याची खबरही "वरच्या साहेबांना" नसते. पण इतिहास मात्र याच्या नोंदी विसरत नाही. तो कुठे ना कुठे याची नोंद ठेवत असतो. म्हणूनच येणाऱ्या काळात कोणीही नेहरू, आंबेडकर होणार नाहीत कारण त्यांची एक "ब्लॅक हिस्ट्री" लिहली जात आहे. या इतिहासाचे लेखन आपल्याला थांबता येईल का? कि दिवसेंदिवस याला कार्यकर्त्यांकडून काही पाने जोडली जातील.

      कोणाचीही नोंद इतिहासात "ब्लॅक हिस्ट्री" म्हणून होऊ नये. कारण आयुष्यात सर्व काही चांगलं केलेलं असताना नकळत अशा  गोष्टी  घडतात आणि त्यातून आपण पुरते बदनाम होतो. एका बाजूला चांगल्या कार्याचा इतिहास लिहला जात असताना दुसऱ्या बाजूला कोणीतरी काळा इतिहास देखील लिहायला बसलेलं असतं. त्यांना असे काही संदर्भ मिळत जतात कि ते प्रत्येक गोष्टीला "काळा" रंग देत जातात आणि हा इतिहास एवढा लोकप्रिय होतो की, लोक त्याला आवडीने वाचतात देखील. या ब्लॅक हिस्ट्री पुढे चांगला इतिहास कधीच प्रकाशझोतात येत नाही. आपल्याकडे महाराष्ट्रातला जनसमूह सध्या या दोन्ही बाजूनी पाहतो आहे.

महाराष्ट्राल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीला. राज्यात होणाऱ्या प्रत्येक सत्ता बदलला, इतकेच नव्हे तर, शिक्षण, समाज, अर्थ, राजकारण या किंवा अशा कोणत्याही क्षेत्रात घडणाऱ्या (चांगल्या आणि वाईट) घटनेच्या पाठीमागे नेहमीच एका व्यक्तीचा हात असतो. ती व्यक्ती म्हणजे "शरद पवार." हे सूत्र लोकांनी पाठच करून ठेवलं आहे. आपला चेहरा लोकांच्या नजरेत जितका पुरोगामी आहे तितकाच प्रतिगामी देखील बनत चालला आहे.  हा चेहरा प्रतिगामी आणि विशेषतः दलित विरोधी आहे. नामांतराच्या लढ्यापासून ते खैरलांजी प्रकरणापर्यंत, या दोन्ही चेहऱ्यांना दोन्ही गटांनी जिवंत ठेवलं आहे. अर्थातच त्यासाठी आपला पक्ष, काही नेते व काही कार्यकर्ते देखील जबादार आहेत हे विसरून चालणार नाही. (काही चांगल्या नेत्यामुळे व कार्यकर्त्यामुळे आपला पुरोगामी चेहरा टिकून आहे.) जेव्हा मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला तेव्हा आपल्यावर गाणी लिहली गेली, आपले सत्कार झाले नव्हे समाजातला एक मोठा गट आपल्याशी जोडला गेला. पण जेव्हा जेव्हा प्रतिगामी लोकांचे समर्थन आपल्या पक्षाकडून, कार्यकर्त्यांकडून केले गेले  तेव्हा तेव्हा आंबेडकरी समाज आपल्यापासून दुरही गेला. अनेक प्रकरणात आपल्यातील काही नेत्याचं आणि कार्यकर्त्यांचं प्रतिगामी लोंकाना पाठबळ देखील मिळत गेलं. जेव्हा खैरलांजी सारख्या गावाला आपल्या पक्षाच्या सत्ता काळात "तंटामुक्त गाव" पुरस्कार दिला गेला तेव्हा आणि अशा अनेक घटनांत आपल्यावर प्रतिगामीत्वाचे स्टॅम्पच मारले गेले आणि पुरोगामीत्वाच्या चेहऱ्यावर प्रतिगामीत्वाचे न मिटणारे डाग लागले. 

हे डाग नागपूरचं बनसोड  प्रकरण असो की लासुर आणि परळीत (सामाजिक न्याय मंत्र्यांच्या जिल्ह्यात) घडणाऱ्या घटना असोत अशा अनेक घटनांमध्ये ते डाग इतके घट्ट होत चाललेत कि, त्यांना कोणतेही डिटर्जेन्ट धुऊन काढू शकत नाही. त्यामुळे हे निश्चित आहे की, आपल्या  पश्चात आपले दोन इतिहास लिहले जातील एका इतिहासात आपण इतके पुरोगामी असू कि त्याचा कोणी विचारही केला नसेल पण एका इतिहासात इतके प्रतिगामी असाल कि त्या इतिहासात 100 वर्षाची आर एस एस देखील फिकी पडलेली असेल. कारण महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक दलित अत्याचाराच्या पाठीमागे आणि आरोपीला वाचविण्यात आपल्या पक्षातील लोकांचा  कसा हात होता हे लोकांना थेट वाचायला मिळेल. जे लोक पुरोगामीत्वाचा इतिहास लिहतील ते काही काळानंतर थकतील कारण त्यांच्या पुस्तकांना मिळणारा वाचक वर्ग हा अत्यंत कमी असेल. ज्यांना गुन्हेगारीतून वाचवलं, ज्यांना रस्त्यावरचं उचलून आमदार केलं ते लोक फक्त काही पुस्तके विकत घेतील. ते वाचणार देखील नाहीत. पण प्रतिगामित्वाचा इतिहास लिहणारे लोक काही थकणार नाहीत कारण त्याचा वाचक वर्ग भरपूर असेल. ते वाचतील आणि येणाऱ्या पिढ्यांना ते इतिहास समजावून देखील सांगतील. त्यामुळे इतिहासात आपली नोंद जितकी प्रतिगामी म्हणून असेल तितकी पुरोगामी असणार नाही आणि आपले कार्यकर्ते ठेवणार देखील नाहीत. कारण जवळपास नव्वद टक्के कार्यकर्ते सध्याच्या काळात असे आहेत की, ज्यांना निष्ठेशी नाही तर सत्तेशी देणे घेणे आहे. (याचा अनुभव 2019 च्या निवडणुकीत आपल्या सर्वानाच आला आहे.) 

मुळ मुद्दा असा आहे की हे सगळं का होत चाललं आहे आणि हे डाग घट्ट का होत चालले आहेत. जेव्हा नामांतराचा लढा पेटला तेव्हा तो 17 वर्ष चालला हा लढा चालू राहण्याच्या पाठीमागे आपला हात आहे, खैरलांजी ला तंटामुक्त गाव पुरस्कार देण्यात आपला हात आहे, भांडऱ्याच्या पोट निवडणुकीत बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात दिलेला उमेदवार देखील खैरलांजी प्रकरणातील आरोपीचा नातेवाईक होता, तो उमेदवार देखील आपणच दिला. अकोल्यात 2014 व 2019 या दोन्ही निवडणुकीतील पराभवाला देखील आपली रणनीती होती, बीजेपी च्या काळात जे मोर्चे एकमेकांच्या विरोधात निघाले त्यात आपला हात आहे किंवा आज चालू असलेल्या बनसोड प्रकरणावर आपणच पडदा टाकण्याचे काम करत आहात. कारण त्यात आपल्याच सत्तेत असलेल्या एका मंत्र्यांच्या नातेवाईकांचा हात आहे. असे कितीतरी आरोप आपल्यावर केले जात आहेत आणि ते लोकांना सहज पटत देखील आहेत. त्यामुळे हे डाग दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहेत. ज्याला पुसने आपल्यालाच काय आपल्या पूर्ण पक्षाच्या यंत्रणेला देखील भविष्यात शक्य होणार नाही. 

आज महाराष्ट्रात आपली सत्ता आहे नव्हे मुख्यमंत्री म्हणून आपलाच अदृश्य चेहरा लोकांना दिसतो आहे. त्यामुळे सद्याच्या सर्व फेसबुक पोष्ट जरी चेक केल्या किंवा सहज सर्वे जरी केला तरी उद्धव ठाकरे यांच्यावर कोणीही आरोप करत नाही किंवा त्यांना दोष देखील देत नाही. कारण महाराष्ट्रात घडणाऱ्या सर्व अत्याचाराच्या पाठीमागे आणि त्यातील आरोपीना वाचविण्याच्या पाठीमागे आपण आणि आपलं मंत्रिमंडळ आहे. हा मुद्दा लोकांच्या मनात ठासून भरलेला आहे. लासुर, बीड आणि नागपूर प्रकरणानंतर लोक स्पष्टपणे सांगतायत कि आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडून वेगळ्या आपेक्षा होत्या. यांच्यापेक्षा तर बीजेपी सरकार चांगलं होत. कारण यातल्या कुठल्याच प्रकरणावर कोणताच निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही आणि पोलीस यंत्रणेला घेऊ दिलेला नाही. 

या सर्व घटनांचे डाग ना उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर असतील ना गृहमत्र्याच्या. हे सर्व डाग थेट पक्ष प्रमुख म्हणून आपल्या चेहऱ्यावर असतील. कारण महाराष्ट्र आपल्यात आजही अदृश्य मुख्यमंत्री पाहतो आहे आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या पाठीमागे आपलाच हात आहे असेच लोक समजत आहेत. लोकांच्या या भावनांची जेव्हा इतिहासात नोंद होईल तेव्हा प्रतिगामीत्वाचं पारडं निश्चितच जड असेल. तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती राहील कि, तुमचं सरकार आहे (मला आजूनही माझं वाटलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अपवाद वगळता) किमान तोपर्यंत तरी असे डाग आपल्या पुरोगामी चेहऱ्यावर लागू नयेत याची काळजी घ्यावी. लासुर, बीड आणि नागपूर अशा घटना किमान आपण हयात आहात तोपर्यंत तरी घडणार नाहीत आणि घडल्याचं तर आपण प्रत्यक्ष लक्ष घालून आरोपीवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणेला भाग पडावे तेव्हाच कुठे हे डाग पुसले जातील आणि आपला एक वेगळा इतिहास लिहला जाईल. कारण कोणाच्याही इतिहासासाठी हे डाग चांगले नसतात. ज्याचा संदर्भ म्हणून उपयोग केला जाईल आणि एका न घडलेल्या "ब्लॅक हिस्ट्री" चा जन्म होईल. या इतिहासात आपले नाव असणार नाही याची काळजी आतापासूनच घेतलेली बरी. 

आपल्या पक्षाचा 21 वा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा! आपल्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्राला सोन्याचे दिवस येवो. महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया, सुशिक्षित बेरोजगार यांनाही चागले दिवस येवो आणि हा महाराष्ट्र आपल्या नेतृत्वात अन्याय आणि अत्याचारमुक्त होओ आणि याचा नवा इतिहास आपल्या नावाने लिहला जाओ. हीच अपेक्षा. 

Thursday, June 4, 2020

कार्यकर्त्यांचं लॉकडाऊन - डॉ. ह. नि. सोनकांबळे



आपला नेता निवडून यावा या साठी जीवाचं रान करून प्रचार करणाऱ्या, नवस बोलणाऱ्या, माय-बापानं सांगितलेलं काम सोडून सोशल मीडियावर आपल्या नेत्यांचा तुफान प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याला या लॉकडाऊन च्या काळात आपल्या त्याच नेत्यांचा एक फोन तरी आला आहे का? माझा कार्यकर्ता या काळात त्याच्या घरची चूल कशी पेटवत असेल. त्याची आई, त्याचा बाप, त्याची बायको, त्याचे लेकरं या काळात जिवंत आहेत का? त्याची बायको आणि आई चुलीकडे बघून काय विचार करत असतील? याचा विचार तरी कोणत्या नेत्याच्या मनात आला आहे का? आला असेल तर त्यांनी एखादा फोन अशा कार्यकर्त्याना या अडीच महिन्याच्या काळात केला आहे का? जर केला असेल, तुमच्या चुलीची काळजी त्यांनी या काळात घेतली असेल तर तोच तुमचा खरा नेता आहे. जर आला नसेल तर आजच सावध व्हा आणि पोटा पाण्याचा काही तरी धंदा करता येतो का ते बघा. 

काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचं दुःख मांडणार भाषण केलं होत. त्यात त्यांनी कार्यकर्त्याना, त्याच्या आई, वडील, बायको या सर्वांना सावध केलं होतं. ते म्हणाले होते की, दिवसभर जर तुमचा पोरगा एखाद्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरत असेल आणि रात्री तो रिकाम्या हाताने घरी परत येत असेल तर त्याच्या आईला, वडिलांना, बायकोला काय वाटत असेल? माझ्या पक्षात काम करणारा पोरगा आता रिकाम्या हाताने कधीच घरी परत जाणार नाही. जर तो माझ्यासाठी दिवसरात्र एक करत असेल तर त्याची चूल पेटविण्याची जबाबदारी राज ठाकरेंची असेल. 

याचा अन्वयार्थ असा होता की, जर तुम्ही एखाद्या पक्षाला, नेत्याला वेळ देत असेल तर त्यांनी तुमच्या चुलीची जबाबदारी घेतली पाहिजे. पण असं होत नाही. या लॉकडाऊनच्या काळात सामान्य मातदारापर्यंत तर सोडाच पण किमान आपल्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यापर्यंत या नेत्यांची मदत नाही तर नाही पण ख्याती खुशालीची रेंज तरी पोहचायला हवी होती. आता वेळ मिळाला नाही हे काही कारण असू शकत नाही. कारण या काळात तुमच्या नेत्याकडे काहीच काम नव्हते. ते नाही का, एक केंद्रीय मंत्री घरी बसून भाजी नीट करत होते. त्यांच्या इतका वेळ तर नक्कीच तुमच्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार आणि खासदारांकडे असणारच असणार. मग एक रिंग वाजायला काहीच हरकत नव्हती.

खरं तर अनेक नेत्यांनी या लॉकडाऊन च्या काळात स्वतःला लॉक करून घेतलं आहे. ते कोणाच्याही सम्पर्कात येत नाहीत. कारण त्यांना माहित आहे निवडणूका होऊन आजून एक वर्षही पूर्ण झालं नाही आणि पुढच्या चार वर्षात हे सगळं विसरलं जाईल. जर समजा निवडणूका आता दोन तीन महिन्यांनी असत्या तर नेते एक तर तुमच्या घरून हलले नसते किंवा तुमची सर्व व्यवस्था त्यांनी फार्म हाऊस वर केली असती. पण ते म्हणतात ना "गरज सरो आणि वैद्य मरो" तशीच अवस्था आज कार्यकर्त्यांची झाली आहे.

 काही कार्यकर्त्यांनी साहेबांनी दिलेली पाकिटे, आणि 15 दिवसाचं रेशन (जे कि सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी वाटण्यात आलं होतं. एकदा फोटो काढून झाले की ते दुसऱ्या वेळेस वाटले देखील नाहीत. करणं फोटोच इतके काढलेत कि तेच आजून अपलोड करायचे संपले नाहीत) यावर देखील भागवलं आहे आणि त्यालाच ते मदत म्हणून बसले आहेत. पण त्या कार्यकर्त्याला हे कोण समजावून सांगायचं कि ती मदत नव्हती तर "लोकांना वाटून शिल्लक राहिलेलं, साहेब म्हणाले घेऊन जा तू पण एखाद" पण साहेबांनी तुला पर्मनंट रेशन मिळावं याची काही व्यवस्था केली आहे का? तर अजिबात नाही. तुझी तशी व्यवस्था केली तर तू नाही का "आत्मनिर्भर" होणार आणि मग साहेबांच्या प्रचारापासून दूर जाणार. 

एक कार्यकर्ता सांगत होता, निवडणुकीच्या काळात  साहेबांकडून जेवणाबरोबर रिचार्ज देखील यायचं पण आता काहीच येत नाही. एके  साहेबांनी गरिबांना रेशन वाटायसाठी बोलावलं पण साहेबांना कोण सांगणार कि, तुमचा हा कार्यकर्ताच त्याचा पहिला लाभार्ती आहे. मी पण मग असाच दोन पाकिटे रेशनची माझ्याच घरी टाकले. आता तेही संपत आले. साहेबांना दिसत नसेल का माझी गरिबी. 

दुसरा एक जण म्हणाला, जेव्हा निवडणुकीचा प्रचार करत होतो तेव्हा भाऊ जवळ घेऊन, खांद्यावर हात ठेवून विचारायचे" घरी सर्व बरं आहे ना, काही लागलं तर सांगत चल" दिवसातून भाऊ दोन ते तीन वेळेस फोन करायचे. तेव्हा वाटायचं "आपल्याला अच्छे दिन" आले. पण आता लॉकडाऊन सुरु होऊन अडीच महिने झाले. भाऊंचा साधा मेसेज देखील नाही आणि मी केलेल्या मेसेज ला भाऊ उत्तर देखील देत नाहीत. 

तिसरा एक म्हणत होता, वडील सुरुवातीपासून याच पक्षात काम करतात. म्हणून मीही बी ए ला असताना त्यांच्या सम्पर्कात आलो. निवडणुकीच्या काळात वडील एखादी ( भाड्याची) गाडी घेऊन त्यावर झेंडा लावून प्रचार करत फिरायचे. मलाही थर्ड इयर ला गेल्यावर तसेच फिरावं वाटलं. मलाही तेव्हा पाहिल्यांदाच मतदान आलं होतं आणि कॉलेज मध्ये राज्यशास्त्राच्या सरांनी लोकशाही, मतदानाचा अधिकार थोडाफार शिकवला होतं. म्हणून मीही जोशात प्रचाराला लागलो. मार्च-एप्रिल याच निवडणुकीच्या धामधुमीत गेला आणि बी. ए. केव्हा नापास झालो कळलंच नाही. कार्ट नापास झालं म्हणून वडील खूप रागावले. घरी बसून विषय काढतो म्हणून सांगितलं पण घरी काही अभ्यास होत नव्हता. गावात नुसत्या राजकारणाच्या गप्पा सुरु राहायच्या त्यात मी तर प्रत्यक्ष प्रचारात काम केलं होतं. एक दोन वेळेला साहेबांनी खांद्यावर हात टाकला होता आणि ते फोटो माझ्याकडे होते. लोक मला साहेबांच्या जवळचा समजायचे. या धुंदीत असेच तीन चार वर्षे निघून गेले. बी. ए. चा अभ्यास घरी बसून काही होत नव्हता. शेवटी इंग्रजीचा पेपर कसा तरी काढला पण तोपर्यंत घरच्यांनी मुलगी बघायला सुरुवात केली होती. लग्न झालं अन गावातच राहिलो. नेहमी वाटायचं माझा बाप आणि मी दोघेही पक्षात काम करतो. साहेबांची चांगली ओळख देखील आहे. आपलं काम होईल कुठे ना कुठे. पण काही झालं नाही. साहेब तिन वेळेस आमदार होऊन आता या वेळेस खासदार झालेत. त्यांचा मुलगा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. पण तो या वर्षी आमदार झाला. माझा बाप आणि मी दोघेही आहोत तिथेच आहोत. या लॉकडाऊन च्या काळात ना साहेबांचा फोन ना पक्षाचा. 

रोज हे ऐकतोय, चर्चा करतोय. मन सुन्न होत आहे. वाटतं यावर खूप लिहावं. पण वाटतं जाऊ द्या कोण वाचणार आहे आणि कोण इतका विचार करणार आहे. आज सांगितलं तरी उद्या तेच होणार आहे. 

दरम्यान एकाने मला कार्यकर्त्यांची व्याख्या विचारली, तू राज्यशास्त्रात पीएच. डी. झाला. पुस्तकात कार्यकर्त्यांची व्याख्या काय केलेली आहे. काही वेळ मला असं वाटलं की, हिवाळ्यात खूप थंडी आहे म्हणून मी पांघरून झोपलोय पण कुणी तरी अंगावरची चादर ओढून थंडगार पाणी माझ्या तोंडावर फेकलंय. कारण आजपर्यंत मी कार्यकर्त्यांची व्याख्या कुठेच वाचली नव्हती. मलाही गरज वाटली नाही व्याख्या तयार करायची. कारण मला असं वाटायचं की पक्षात कोणीच कार्यकर्ता नसतो सर्व नेतेच असतात छोटे किंवा मोठे. पण या सर्व चर्चा ऐकल्या तेव्हा शेवटी या व्याख्येवर येऊन पोहचलोय. कार्यकर्ता म्हणजे आशेवर जगणारा एक सैनिक आहे. जो साहेबांना गड जिकुंन देतो आणि शहीद होतो. पण शाहिद झाल्यावरही त्याचा फोटो कधीच साहेबांच्या घरात, कार्यालयात किंवा साहेब जग सोडून गेल्यावर त्याच्या फोटो खाली देखील नसतो. 

अनेक जुन्या आणि आणि नवीन कार्यकर्त्याबोरोबर चर्चा चालू आहे. अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांचे किस्से ऐकायला मिळत आहेत. असं वाटतं त्याचं एक चांगला पुस्तक होईल आणि किमान त्या नेत्यांच्या जयंत्या साजऱ्या करणाऱ्या आजच्या कार्यकर्त्याना तरी "प्रॅक्टिकल राजकारण" कळेल. 

तुम्ही देखील अशा चर्चा करा आणि समजून घ्या "कार्यकर्त्यांचं लॉकडाऊन".