Wednesday, April 17, 2019

स्टॅलिनचं कोंबडं

 स्टॅलिनचं कोंबडं 

डॉ. ह.  नि. सोनकांबळे 
dr. hanisonkamble@gmail.com

#या कथेचा भारतीय मतदारांशी काहीही संबंध नाही, असलाच तर तो एकमात्र योगायोग समजावा. 

एके दिवशी स्टॅलिन  एक कोंबडं  घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला,
कोंबड्याचं मुंडकं स्टॅलिनने आपल्या बगलेत दाबून धरले होते, 
आणि तो चालत चालत, त्या कोम्बड्याचे एक एक पंख उपसून काढत होता. 
कोंबडा जिवाच्या आकांताने ओरडत होता. तो स्टालिनच्या बगलेतून सुटका करू  पाहत होता. 
पण स्टॅलिन  त्याला न सोडता, त्याच्या ओरडण्याकडे लक्ष न देता, पंख उपसत होता. 
मंत्रिमंडळातले सदस्य स्टॅलिनला म्हणत होते, त्या मुक्या प्राण्याला असा त्रास देऊ नका, सोडा त्याला. 
पण स्टॅलिन कोणाचेही ऐकायला तयार नव्हता. 
शेवटी सर्व पंख उपसून झाल्यावर त्याने त्या कोंबड्याला खाली फेकले. 
आणि खिशातून काही दाणे काढून तो कोंबड्याला खाऊ घालू लागला. 
अशा अवस्थेत कोंबडा ते दाणे खाण्यासाठी पुन्हा स्टॅलिनच्या हाताकडे बघू लागला. 
स्टॅलिन देखील त्याला दाणे खाण्यासाठी जवळ बोलावू लागला आणि थोड्या वेळाने ते थोडेफार दाणे खाण्यासाठी तो कोंबडा स्टालिन जवळ येऊन बसला. इतका वेळ जो कोंबडा स्टॅलिन पासून सुटका करून घेत होता तोच कोंबडा चार दाण्यासाठी स्टॅलिन च्या पुन्हा जवळ बसला. 
मंत्रिमंडळातले सर्व लोक त्याला म्हणाले. की, हा काय प्रकार होता. 
त्यावर स्टॅलिन  म्हणाला, मतदार हे असेच असतात  साडे चार वर्ष आपण त्यांचे पंख  उपसायचे असतात आणि शेवटी सहा महिन्यात त्यांना चार दाणे टाकायचे असतात. 
या चार दाण्याच्या नादात हे मतदार साडेचार वर्षात आपण केलेला सर्व अन्याय विसरून जातात. 
आणि आपल्यालाच मतदान करतात. 

पुन्हा एकदा # या कथेचा भारतीय मतदारांशी काहीही संबंध नाही, असलाच तर तो एकमात्र योगायोग समजावा. 

Sunday, April 7, 2019

राज ठाकरेची गरज काँग्रेस ला का भासतेय?





डॉ. ह.  नि. सोनकांबळे 
dr. hanisonkamble@gmail.com

राजकारण हा सत्तेचा खेळ आहे, ज्याला कुणाला या खेळाचे नियम आणि डावपेच माहित असतात तोच या खेळाचा विजेता असतो.  कधी काळी या खेळाचे तरबेज खेळाडू म्हणून काॅंग्रेसमधल्या अनेकांची नावे घेतली जायची त्यातले बरेच जण आज हयात नाहीत. पण याच यादीत ज्यांचे नाव घेतले जायचे ते ‘शरद पवार’ आज हयात आहेत. पण ते सध्या एकटे  आहेत.  महाराष्ट्राच्या राजकारणात जो वैचारिक बेस (Think Tank) त्यांच्याकडे होता तो आता दिसत नाही. कधी काळी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची सभा म्हटलं की, लोक काही दिवस आगोदरपासूनच तयारीत असायचे कारण नवीन काही तरी ऐकायला भेटणार आणि आपल्यालाही काही तरी शिकायला भेटणार असे लोकांना वाटत होते. अता तसे कोणालाही वाटत नाही कारण जी माणसे बोलायला स्टेजवर असायची तशी माणसे पुढे कोणालाही सांभाळता आली नाहीत, राजकारणातला अरेरावी  पणा बघून कोणते विचारवंत देखील त्यांच्याकडे जात नाहीत.  खरे तर पक्ष उभा असतो तो विचारधारेवर, आणि सध्या काॅग्रेंस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, मनसे या कोणत्याही पक्षाकडे विचारधारा नाही. केवळ मोंदींना हरवण्याच्या अजेंडयाखाली निवडणूका लढवल्या जात आहेत आणि त्या साठीच लोकांनी एकत्र यावे असेच चित्र निर्माण केले जात आहे. वैचारिक पातळीवर लोकांना एकत्र जोडणारा एकही नेता या पक्षाच्या स्टेजवर दिसत नाही. त्यामूळे मध्यम सुशीक्षीत वर्ग दूर गेला आहे.

परिणामी, वक्तृत्व स्पर्धेतल्या पोरांना स्टेजवर बोलवून मोदिविरोधात बोलायला लावणे आणि टाळया आणि शिटयात सभा संपवणे हेच चित्र सध्या दिसत आहे. म्हणूनच सुषमा अंधारे, राज ठाकरे ( कधी काळी एकमेकांची टिंगल करणारे) अशा एका स्टेजवरुन दुसऱ्या स्टेजवरच्यांना वाकडं तिकडं बोलून टिंगल करणाऱ्या (मनोरंजनासाठी ) लोकांची आवश्यकता काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसला भासत आहे. कधी काळी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांसमोर विचारवंत हा शब्द देखिल वापरला जायचा आता त्या लायकीचे नेते कुठेच दिसत नाहीत. म्हणून एखाद्याला जर मोदीविरोधात टिका करता येत असेल, किंवा मोदीवर हास्य कविता करता येत असेल तर त्याला अशा स्टेजवर संधी मिळण्याची शक्यता आहे.

बोलणाऱ्या लोकांची एक फळी पक्षात असावी ही बाब महत्वाची आहेच पण काहीही बोलून मनोरंजन केल्याने गर्दीचे रुपांतर मतात होत नाही हे दहावीत नागरीकशास्त्र शिकणारा पोरगा देखिल सांगू शकतो पण ही गोष्ट काॅंग्रेसच्या नेत्यांना का कळत नसावी? कारण तेवढं चिंतन करण्यासाठी देखील त्यांच्याकडे माणूस उरला नाही हे वास्तव कोणीही नाकारु शकत नाही.

खरे तर हक्काने मते मागण्याचा अधिकार केवळ काॅंग्रेसकडेच असायला हवा होता  कारण 60 वर्ष सत्तेत राहून केलेल्या कामाच्या पावत्या दाखवून ते लोकंाना हक्काने मते मागू शकतात पण ती कामे लोकांना पटवून देण्यासाठी देखील माणसे लागतात. पण त्यातही त्यांची वानवा सुरु आहे.

महाराष्ट्रात अशी माणसे केवळ काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसकडेच असू शकली असती कारण रयत शिक्षण संस्थे सारख्या सगळयात मोठया शिक्षण संस्थेसह महाराष्ट्रातील इतर संस्था देखील त्यांच्याकडे आहेत. पण या शैक्षणीक संस्थामध्ये केवळ प्रचार यंत्रणेसाठी वापरली जावीत अशीच माणसे दिसतात. काही वर्षापासून आ. सतीष चव्हाण यांनी मराठवाडयाचा महावक्ता या स्पर्धेतून बोलणारांची एक फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या फळीला जी विचारधारा देणे आवश्यक होते ती पुढे  पुरवली गेली नाही.  त्याच्यामूळे स्पर्धेत बक्षीसे मिळवून ती पोरं देखील घरीच आहेत.

मूळात मुददा हा आहे की, ज्या स्टेजवरून कधी काळी, डॉ. जनार्धन वाघमारे, प्रा. लक्ष्मण ढोबळे, लक्ष्मण माने, रामदास फुटणारे अशा अनेकांनी वैचारिक प्रबोधनातून माणसे जोडली त्या काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सारख्या मोठया पक्षावर अशी वेळ का आली? आणि अश्या अवस्थेत हे दोन्ही पक्ष कोणती राजकीय क्रांती करण्याचे स्वप्न बघत आहेत?  कारण जेवढया काही क्रांत्या राजकीय पक्षांनी जगभरात केल्या आहेत त्या सर्व कोणत्या ना कोणत्या विचारधारेवर केलेल्या आहेत. जो पक्ष विचारधारेवर आधारलेला नसतो तो लवकर संपुष्टात येतो. काॅंग्रेस मधली ‘समिश्र राष्ट्रवाद’ सांगून लोकांना एकमय करणारी विचारधारा संपुष्टात आल्याने आता पक्ष देखील संपुष्टात येवू लागला आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही.

पण तोच संमिश्र राष्ट्रवाद सांगून, लोकांच्या मूलभूत प्रश्नावर बोलून, लोकांना पटणारी विचारधारा शांतपणे सांगून लोकांना एकत्र करण्यात ऍड. बाळासाहेब आंबेडकर यशस्वी होत आहेत. गर्दीचे रूपांतर मतात करत आहेत. म्हणून लोकांची गर्दी त्यांच्यासभेला वाढत आहे. आता ती कमी करण्यासाठी, तरुण पोरांना आकर्षित करण्यासाठी राज ठाकरे च्या सभा घ्या असे काँग्रेस सांगत आहे. 60 वर्ष सत्ता उपभोगून शेवटी राज ठाकरे यांची सीएचबी वर नियुक्ती केली गेली. राज ठाकरे  यांच्या भाषणाचे अनेकांनी  कौतुक केले कारण  त्यांनी मोदींवर टीका केली. पण निवडणूका या केवळ टीकेवर जिंकता येत नाहीत, किंवा टीका करून लोकांच्या मनात स्थान देखील निर्माण करता येत नाही. त्यासाठी पक्षाकडे एक विशिष्ट्य कार्यक्रम असावा लागतो जो कि सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे दिसत नाही. म्हणूनच काहीतरी सांगून सभेत मनोरंज करण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. ज्याने लोकांचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत.


Friday, March 22, 2019

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे परराष्ट्र धोरण




डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे परराष्ट्र धोरण 

 
डॉ. ह. नि. सोनकांबळे 
 
dr.hanisonkamble@gmail.com


बुध्दाची भूमी हीच भारताची जागतीक ओळख असून प्राचिन काळापासून भारताचा शेजारील राष्ट्राशी  सांस्कृतीक सबंध जोडला गेला आहे. तथागत बुध्दानंतर फाहियान सारखे अनेक चिनी प्रवाशी  भारतात आले आणि बुध्दाच्या या भुमीचा अभ्यास करुन जगभरात तथागत गौतम बुध्दाचा उपदेश  त्यांनी पोहचवला. इतकेच काय तर नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठाचे माॅडेल जगाला देणारा भारत हा एकमेव प्राचिन देश  असल्याने अनेक देशातील विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येत असत आणि या देशातील बुध्दाची शिकवण ते आपल्या मायदेशी परत गेल्यावर आपल्या देशाला देत असत. म्हणूनच आज भारताविषयी अनेक देश आदर बाळगून असतात. परंतु याचा विचार प्रकर्शाने पुढे येत नाही. आज भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलायचे झाले तर केवळ आर्थीक कारणापुरते बोलले जात आहे. सांस्कृतीक देवाणघेवाण म्हणावी तशी  होत नाही. आपल्या देशाला तेल, गॅस व अन्य जीवनावश्यक  वस्तु पुरवठा करणाÚया देशाविषयी आपले सबंध कसे असावेत यावरच केवळ चर्चा घडून येत आहे. परंतु बुध्द कालखंडात भारताचा व्यवहार इतर देशासोबत कसा होता याचा विचार आज होताना दिसत नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धागा धरुन भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार मांडला होता. अनेकांना असा प्रश्न पडतो की, परराष्ट्र धोरणाशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा काय सबंध आहे. कारण सर्वांना आजपर्यंत भारताच्या परराष्ट्र  धोरणाचे जनक पं. नेहरु आहेत हेच शिकवले गेले आहे. परंतु त्यांचे परराष्ट्र धोरण कसे चुकीचे होते हे सांगणारे तत्कालीन मंत्रीमंडळात एकमेव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यासबंधीचा आढावा या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे. 


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिल्यानंतर 10 आॅक्टोबर 1951 रोजी आपल्या राजीनाम्याची कारणे सभागृहात मांडण्यासाठी ते उपस्थित झाले होते. परंतु त्यांना त्यांचे म्हणने मांडू दिले गले नाही. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा त्याग करुन बाहेर पडले. सभागृहाच्या बाहेर वर्तमानपत्रांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती ठीक नसल्याचे आणि हिंदू कोड बील मंजूर होत नसल्याचे अशी दोन कारणे राजीनाम्यामागे असल्याची पुष्टी  जोडली होती. त्यांच्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्रक काढून आपल्या राजीनाम्याची कारणे त्यांत मांडली होती. त्यात अनेक कारणाबरोबरच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे एक महत्वाचे कारण होते.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हा राजीनामा प्रस्तुत करत असताना म्हणतात की, मला खरी चिंता आहे ती देषाच्या परराष्ट्र धोरणाची. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातं॰य मिळाले तेंव्हा आपल्या बददल वाईट विचार करणारा किंवा आपले वाईट चिंतनारा एकही देश  नव्हता. मागील चार वर्षात  मा॰ा यात अचानक बदल झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. जगातील प्रत्येक देश आपला मित्र होता. आज हे सर्व मित्र आपल्याला सोडून गेले आहेत. आपल्याला त्यांनी वाळीत टाकले आहे. आपण सुरकुतलेल्या चेहऱ्याने युनोच्या निर्णयावर आपल्या ध्येयाचा पाठलाग करीत आहोत. जेंव्हा मी आपल्या परराष्ट्र धोरणाचा विचार करतो तेंव्हा मला बिस्मार्क आणि बर्नाड शॉ यांच्या एका वाक्याची आठवण होते. ते म्हणाले होते की, राजकारण इच्छित तत्व, ध्येय साध्य करण्याचा खेळ नसून, राजकारण हा शक्यतेचा खेळ आहे. चांगली तत्वे ही चांगली असतात पण अति चांगुलपणा हा घातक असतो असे म्हणून बर्नाड शॉ ला  जास्त दिवस झाले नाहीत. परंतु आपले परराष्ट्र धोरण हे या दोन महान व्यक्तीच्या विचाराच्या विरुध्द आहे. आपल्या देशातील बहुतांश भुकेल्यांना अन्नपुरवठा व औद्योगीकरणास मदत करण्यास आपल्या देशात अडचणी येतात. अस्तित्वात न येणारे आणि अति चांगुलपणाचे धोरण आपल्याला कसे घातक ठरते हे या उदाहरणावरुन स्पष्ट होते. 



आपल्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम आपल्या तिजोरीवर कसा होतो हे सांगत असताना ते म्हणतात की, आपण वर्षात 350 कोटी रुपये कर रुपाने मिळवतो व त्यापैकी सुमारे 180 कोटी रुपये आपण सैन्यावर खर्च करतो. हा प्रचंड खर्च आपल्या परराष्ट्र धोरणाचा सरळ परिणाम आहे. आपल्याला ही रक्कम आपल्या स्वतःच्या संरक्षणाकरीता द्यावयाची आहे कारण आपला असा कोणी मित्र नाही ज्यावर आपण उदभवू शकणाऱ्या  अपत्कालात मदतीसाठी विसंबून राहू शकू. 


आपला पाकिस्तानशी वाद हा आपल्या परराष्ट्र धोरणाचाच एक भाग आहे. या वादाची दोन महत्वाची कारणे बाबासाहेब सांगतात एक म्हणजे काष्मिर प्रश्न आणि दुसरा पुर्व बंगालमधील आपल्या जनतेची स्थिती. कष्मिरचा प्रश्न मिटवण्यासाठी बाबासाहेबांनी महत्वचा तोडगा काढला होता परंतु राज्यकत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने तो प्रश्न आजपर्यंत चिघळत आला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते काश्मीर  हा प्रदेश  प्रामुख्याने समिश्र राज्य आहे. जम्मूमध्ये हिंदू, लढाख मध्ये बौध्द तर काश्मीर  खोरे हा मुस्लीम प्रदेश  आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी असे स्पष्ट पणे सांगितले की, काष्मिरची फाळणी करावी आणि हिंदू, बौध्द भाग भारतात जोडावा, मुस्लीम भाग पाकिस्तानात जोडावा. वस्तुतः काश्मीरचा  मुस्लीम भागाशी  आपला काहीही सबंध नसल्याने तो प्रश्न   तेथील मुस्लीम आणि पाकिस्तान यांनी सोडवावा. जर वाटलेच तर काश्मीर युध्दबंदी भाग, काश्मीर  खोरे आणि जम्मू लडाख असे तीन भाग करुन सार्वमत घ्या. असे झाले असते तर हा प्रश्न  केंव्हाचाच मिटला असता परंतु केवळ नेहरुंच्या आडमुठेपणामुळे हा प्रश्न आजपर्यंत चिघळत आला असून यावर संरक्षणाच्या नावाखाली भारत करोडो रुपये खर्च करत आला आहे. 


भारत चिन सबंधावरही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष  लक्ष होते. त्यानी चिनच्या आणि भारताच्या हालचाली अचूक पणे अभ्यासल्या होत्या म्हणूनच त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण भारत चिन सबंधातील महत्वाची गोष्ट  म्हणजे 21 एप्रिल 1954 ला या दोन देशात  पंचशील  करार करण्यात आला. यात एकमेकांना सहकार्य करणे, एकमेकांबददल विश्वास  ठेवणे, एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे, एकमेकावर हल्ले न करणे अशा  स्वरुपाचा हा करार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौध्द धम्मावर अतिशय  प्रेम होते तरी त्यांनी या करारावर टिका केली आहे. कारण पंचशीलाचे आचरण चिन करत नाही असे त्यांचे म्हणने होते. ते म्हणतात की, आंतरराष्ट्रीय  राजकारणात पंचशीलाला  जागाच नसते व कम्युनिष्ट  देशात मुळीच नसते बौध्द धम्मात जरी पंचशीलाल महत्व असले तरी चीनच्या माओनी पंचशीलाचे आचरण आगोदर चीनमध्ये करावे. अशी सडेतोड भूमिका घेताना बाबासाहेब दिसतात. 


भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असताना भारत महासत्ता कसा होईल याकडे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विशेष लक्ष होते. 8 नोव्हेंबर 1951 रोजी लखनौ विद्यापीठात विद्याथ्र्यांच्या स्नेहसम्मेलनात बोलताना त्यांनी एक महत्वाचा मुददा उपस्थित केला होता. भारताने एंकतर संसदीय लोकशाही स्विकारावी किंवा साम्यवादी हूकुमशाहीचा मार्ग स्विकारुन अंतिम निर्णयापर्यंत यावे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारत का स्थायी सभासद होत नाही आणि त्यासाठी सरकार का प्रयन्त करत नाही? हा महत्वाचा प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात. तत्कालीन परिस्थितीत नेहरुनी भारताच्या स्थयी सदस्यत्वाविषयी युनोमध्ये बोलायला हवे होते. परंतु असे न करता त्यांनी चिनला स्थायी सदस्यत्व मिळावे म्हणून पाठींबा दिला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर त्या वेळेस म्हणाले होते की, भारताने चिनला पाठींबा देवून आपला वेळ वाया घालवू नये कारण भविष्यात चिन भारताला कधीच मदत करणार नाही. हा त्यांनी दिलेला इशारा खरा ठरला काश्मीरच्या मुदयावर चिनने युनोत भारताच्या विरोधात भूमिका तर घेतलीच पण आजही भारतावरचे चिनचे हल्ले बंद झाले नाहीत. याचा अर्थ असा होतो की, सध्या आपण भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे म्हणून जो प्रयत्न करत आहोत तो साठ वर्षापुर्वीच करायला हवा होता आणि चिनसोबत आपले सबंध कसे असावेत याचा विचार करायला हवा होता. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विषय समजून घेण्यासाठी राज्यकत्र्यांंना आपल्या राजकारणाची साठी ओलांडावी लागली. 


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमिकेबददल ‘द टाइम’ मासिकाने लिहले होते की, डाॅ. आंबेडकर हे एकमेव भारतीय अधिकारी आहेत की ज्यांनी चीनसोबतच्या अतीमित्रत्वावर आणि अमेरिकेबरोबरच्या अल्पमैत्रीबद्दल नेहरुवर उघडपणे हल्ला केला. यावरुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सडेतोड भूमिकेची जाणीव आपल्याला होते. काळाची पावले ओळखून आम्ही आपले परराष्ट्र धोरण आखायला हवे असे बाबासाहेबांना वाटायचे. तशी  दृष्टी त्यांच्याकडे होती. त्याचे उदाहरण आपल्याला देता येते. 1939 साली रशियाच्या क्रांतीवर एका पत्रकाराने त्यांना प्रश्न  विचारला होता की, रशीयाच्या राज्यक्रातीबददल तुमचे काय मत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचारपुर्वत उत्तर देताना म्हटले होते की, फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षा मला ही राज्यक्राती महत्वाची वाटते परंतु ज्या विचाराच्या पायावर रशियाच्या क्रांतीचा डोलारा उभा आहे तो एकेदिवषी कोसळल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांचे म्हणने पन्नास वर्षानंत खरे ठरले रशिया 1991 साली कोसळला. ही दूरदृष्टी फक्त त्यांच्याकडेच होती. 


आता प्रश्न असा शिल्लक राहतो की जर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना असे वाटत होते तर त्यांनी नेहरुना का सांगितले नाही? हाच प्रश्न नेहरुंना देखिल पडतो. या प्रश्नाला  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1951 ला उत्तर दिले आहे ते 1 आणि 8 दिसेबर च्या जनता मध्ये देखिल प्रसिध्द झाले होते. ते म्हणतात की, ‘मंत्रीमंडळात असताना मी त्यासबंधी काहीही बोललो नाही असे नेहरुंचे म्हणने आहे. त्यावर माझे मत असे आहे, की मी 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 पर्यंत घटनेच्या कामात व्यग्र होतो. तेंव्हा परराष्ट्र धोरणावर नेहरुंषी बोलायला वेळच मिळाला नाही.’ खरे तर भारताचे परराष्ट्र धोरण हे खाते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांकडे असते तर भारत एकमेव दहशतवादमुक्त देश झाला असता आणि भारताचे अनुकरण अनेक देशांनी केले असते. कारण सुरुवातीपासून भारत ही बुध्दाची भूमी असून जगाला इथूनच खरा प्रेमाचा, ज्ञानाचा आणि शांतीचा संदेष  गेला आहे. परंतु भारताचे बदलते परराष्ट्र धोरण भारताला या गोष्टीपासून  दूर घेवून जात आहे. एकीकडे महासत्ता होण्याचे स्वप्न बघत असतानाचा जातीच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय मानव अधिकाराची होळी याच देशात पेटवली जात आहे. कधी मानवतेचा संदेश  या देशातून बाहेर पडत होता आज मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनांच्या किंकाळया बाहेर पडू लागल्या आहेत. म्हणूनच जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलू लागला आहे. ब्रिटीश  संसदेचे सदस्य भारताविषयी बोलताना एकवेळेस म्हणाले होते की, भारत काय आहे तर जातीव्यवस्थेचे एक उत्तम उदाहरण आहे. हीच ओळख भारताची जागतीक स्तरावर निर्माण झाली आहे. म्हणून आज वास्तवात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तिन तेरा झालेत आपण नेमके काय करत आहोत आणि कोण आपल्यासोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत याचाच शोध राज्यकत्र्यांना लागत नाही. अलिप्ततावादाचे धोरण आपल्याला आज जगापासून अलिप्त करताना दिसत आहे. नेहरुंचे परराष्ट्र धोरण आम्ही छातीठोकपणे विद्यार्थ्यांना शिकवत असलो तरी हे कसे चुकीचे आणि पळकुटे होते हे दखिल शिकवणे गरजेचे आहे. नेहरुंच्या या धोरणात नंतर श्रीमती इंदिरा गांधींनी थोडासा बदल केला असला तरी तो पुरेसा नाही. येणाऱ्या काळात जर भारताला खरे महासत्ता व्हायचेच असले तर  नेहरुंच्या परराष्ट्र धोरणात खूप मोठे बदल करुन बुध्द ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास समजून घेवून भारताने आपले परराष्ट्र धोरण ठरवणे गरजेचे आहे. तेंव्हाच कुठे पुन्हा एकदा भारतातून प्रेमाचा, ज्ञानाचा, मानवतेचा आणि विश्वशांतीचा संदेश जगभरात जाईल.

विनंती : या विषयावर आपल्याकडे आणखी काही माहिती असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका 

Thursday, March 14, 2019

आता हंगेरीत ‘जय भीम’




आता हंगेरीत ‘जय भीम’ 

डॉ. ह. नि. सोनकांबळे 


हंगेरी मध्ये ‘ जय भीम नेटवर्क’ या संस्थेची स्थापना केली. आणि या नेटवर्कच्या माध्यमातून ससोकाझा, ओझा आणि हेगीमेग या तिन गावामध्ये तीन शाळा सरु केल्या. या शाळेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या शाळेला ‘डाॅ. आंबेडकर स्कुल’ असे नाव देण्यात आले आहे. ही भारतासाठी आणि भारतातील जनतेसाठी अभिमानाची बाब आहे.


युरोपात जावून जय भीम केला तरी आता तुमच्याकडे कोणी आश्चर्याने  पाहणार नाही किंवा असे म्हटल्याने भारतातील लोकांनाही नवल वाटायला नको. कारण गेली अनेक वर्षांपासून जय भीम चा नारा भारतात घुमु लागला असला तरी हा नारा आता जगभरात पोहचला आहे. एखादया व्यक्तीच्या नावाने केला जाणारा हा जगाच्या पाठीवरचा एकमेव जयघोष आहे. हा फक्त जयघोषच नाही तर करोडो लोकांचा स्वाभिमान आणि त्यांच्या जगण्याची प्रेरणा झाला आहे. हाच नारा आता युरोपातल्या हंगेरी या राज्यातही गेली दहा बारा वर्षांपासून घुमु लागला आहे त्या विषयी थोडेसे...

हेही वाचा: अमेरिका, भारतीय संविधान आणि स्त्रिया

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव भारताच्या खेडयात आणि वाडी तांडयापर्यंत पोहचले आहे, या मातीतल्या बौध्द अनुयायांची सकाळच जय भीम च्या जयघोषाने होते असे आपण म्हणत असलो तरी आता हे शब्द आपल्याला बदलावे लागणार आहेत. कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर फक्त भारताच्याच खेडयापाडयापर्यंत पोहचले असे नाही आणि केवळ भारतातल्याच लोकांची सकाळ जय भीम च्या जयघोषाने होते असे नाही तर अशीच सकाळ युरोपातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची देखिल होउ लागली आहे. आज 21 व्या शतकात युरोपातील अनेक आदिवासी जाती जमाती आणि निग्रोच्या शोषणमुक्तीच्या लढयाचे नेतृत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर उभे असल्याचे आपल्याला दिसून येते. दक्षिण आफ्रिकेतील विटवाटर्सरॅंन्ड या विद्यापीठात वर्णभेदाच्या लढयाचे जनक असलेले नेल्सन मंडेला आणि अस्पृष्यमुक्तीच्या लढयाचे प्रेरणास्थान असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषाची जयंती एकत्रीततपणे साजरी केली जाते. त्याचबरोबर दक्षिणआफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो एम्बोकी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या संसदेत 2008 साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या देशाला कसे लागू पडतात याविषयी भाषणही केले होते. याचा अर्थ जगभरातील अनेक लोक डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भारावलेले आपल्याला दिसतात. म्हणूनच जगभरातील अनेक शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठया थाटामाटात साजरी होत असते अशीच जयंती आणि धर्मांतराचा सोहळा युरोपातल्या हंगेरी या राज्यतही दरवर्षी साजरा होतो.



हंगेरी हे युरोपातलं छोटंसं राज्य, जेमतेम लोकसंख्या दहा कोटीच्या आसपास, 9 मोठी व 23 छोटी शहरे आणि बरीच खेडी या राज्यात आहेत. असे असले तरी जगातल्या प्रमुख तीस लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणूनही या राज्याची ओळख जगभरात आहे. दर वर्षी  9 लाख पर्यटक या देशाला भेट देतात. या देशाने 1989 ला संसदीय लोकशाहीचा स्विकार केला आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी इथे सुरु झाली असेच म्हणावे लागेल कारण जगाच्या पाठीवर जिथे जिथे संसदीय लोकशाहीचा विषय असतो तिथे तिथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव असतेच. इथेही अनेक पुस्तकांच्या माध्यमातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पसरले आहेत. 

(इच्छुकांनी जगभरातील माहितीसाठी लेखकाचा खालील ग्रंथ नक्की वाचावा)

युरोपातल्या या हंगेरी राज्यात प्रामुख्याने रोमा आणि जिप्सी या दोन आदिवासी जमाती राहतात. या जमाती अनेक वर्षापासून काळे आणि गोरे या भेदभावाच्या कचाटयात सापडल्या आहेत. भारतात  जी अस्पृश्यांची परिस्थिती होती तशीच  परिस्थिती या जमातींची युरोपात आहे. सामाजिक आणि शैक्षणिक जीवनात यांनीही अस्पृष्यता भोगली आहे. शिक्षण घेत असताना यांनाही शाळेच्या एका वेगळया बाजूला जागा दिली जात असे. परंतु डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रेरणा घेवून हे राष्ट्र  आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करु लागले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन व कार्याचा अभ्यास केल्यावर, त्यांची जगभरात प्रकाशित  होणारी पुस्तके वाचल्यावर रोमा आणि जिप्सी या दोन जमातीचे नेते दडॅक टिबाॅर आणि आॅरसाॅस याॅनाॅस यांना या आदिवासींच्या शोषणमुक्तीची प्रेरणा मिळाली आणि त्यांनी शोषणमुक्तीच्या लढयाला सरुवात केली.
रोमा आणि जिप्सी या दोन आदिवासी जमातीचे नेते दडॅक आणि आॅरसाॅस याॅनाॅस यांनी 2005 आणि 2007 साली महाराष्ट्राला  भेट देवून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शोषणमुक्तीच्या चळवळीचा अभ्यास केला आणि ते भारावून गेले. जेंव्हा ते भारतातून हंगेरीला परत गेले तेंव्हा त्यांनी हंगेरी मध्ये ‘ जय भीम नेटवर्क’ या संस्थेची स्थापना केली. आणि या नेटवर्कच्या माध्यमातून ससोकाझा, ओझा आणि हेगीमेग या तिन गावामध्ये तीन शाळा सरु केल्या. या शाळेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या शाळेला ‘डाॅ. आंबेडकर स्कुल’ असे नाव देण्यात आले आहे. ही भारतासाठी आणि भारतातील जनतेसाठी अभिमानाची बाब आहे. आज या शाळेमध्ये कसल्याच प्रकारचा भेदभाव नाही. शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर फेकल्या गेलेल्या अनेक लहान मुलांना आज या शाळेत सन्मानाने शिक्षण दिले जात आहे. विषेश म्हणजे याशाळेत आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे धडे गिरवले जाउ लागले आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी या शाळेच्या भिंती रंगवल्या गेल्या आहेत. डाॅ. बाबासोहब आंबेडकरांचे आणि तथागत गौतम बुध्दांचेच सुविचार या शाळेच्या भिंतीवर लिहले गेले आहेत. लहान मुलांचे डोेके हे काही भांडे नाही ज्यमध्ये काहीही भरले जाउ शकते त्यांना खरी गरज विचाराच्या प्रकाशाची आहे असे दडॅक आणि आॅरसाॅस याॅनाॅस नेहमी सांगत असतात. बुध्द तत्वज्ञानाची शिकवण देउन समतेचा विचार इथे पेरला जाउ लागला आहे. याच प्रेरणेतून 11 आॅक्टोबर 2009 रोजी रोमाचे 1500 नेते एकत्र येवून त्यांनी बुडापेस्ट इथे एक मोर्चा काढून सर्वच क्षेत्रातील  भेदभाव मिटविण्याची मागणी केली. या मोर्चाची प्रेरणाच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर होते.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचा लढाही या देशात पोहचला आहे. म्हणूनच बौध्द तत्वज्ञानाचे धडे या शाळेत गिरवले जाउ लागले आहेत. 14 आॅक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दिक्षा भूमीवर झालेल्या धर्मांतराचा 56 वा वर्धापन दिन हंगेरीमध्येही साजरा केला गेला. 12 आॅक्टोबर 2013 रोजी अल्सोझोल्का येथे हा सोहळा पार पडला.

‘जय भीम नेटवर्क’ हंगेरी च्या आज स्वतंत्र  वेबसाईट आहेत. www.dzsajbhim.hu, www.ambedkar.eu, www.jaibhim.hu  या संकेतस्थळावर गेल्यावर आपल्याला या नेटवर्कच्या कार्याची माहिती मिळते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, लेख व या नेटवर्कच्या कार्याची माहिती आपल्याला पहावयास मिळते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आणि कार्याने भारावलेले अनेक लोक या नेटवर्कशी जोडले गेले आहेत. या नेटवर्कच्या माध्यमातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रकाश आज जगभरात पसरु लागला आहे. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितांचे नेते एवढयापुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर त्यांच्या विचारांनी आणि कर्तुत्वाने आज जगभरात झेप घेतली आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आणि कार्य जरी 20 व्या शतकातले असले तरी त्यांचे कार्य आज 21 व्या शतकातही सतत प्रेरणा देत आहेत. हीच प्रेरणा घेवून  जय भीम नेटवर्कचे अध्यक्ष आॅरसाॅस याॅनाॅस यांनी अम्नेस्टी इंटरनॅशनल च्या सदस्यत्वाची निवडणूक लढवली आणि ते निवडूणही आले. 


लेख आवडल्यास शेअर आणि कंमेंट करायला विसरु नका

Friday, March 8, 2019

कलम 370, काश्मीर आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

 
 



    डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 370 लिहण्यास नकार दिला 



कलम 370,  काश्मीर आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. ह. नि. सोनकांबळे 
dr.hanisonkamble@gmail.com



नुकताच पुलवामा येथे झालेल्या हल्याने पुन्हा एकदा 370 व्या कलमाच्या चर्चेची तिव्रता वाढविली आहे. पण हे कलम नेमके लिहले कोणी आणि ते संविधानात का आणले गेले? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची 370 व्या कलमाबाबत काय भूमिका होती? का त्यांनीच हे कलम लिहले आहे. याची चर्चा या लेखात करण्यात आली आहे.


भारताच्या स्वातंत्र्याचे दिवस जस जसे जवळ येवू लागले तस तसे भारतातसमोरची आव्हाने वाढू लागली होती. 72 दिवसाच्या अल्प काळात देशातल्या 565 संस्थानांना भारतात सामिल करुन घेवून स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करणे गरजेचे होते तेव्हाच कुठे भारताला खऱ्या  अर्थाने स्वातंत्र्य मिळणार होते. कारण ही संस्थाने बाजूला ठेउन स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करणे शक्य नव्हते. हिंदू मुस्लीमामधील वाढत्या दरीमुळे मुस्लीम लीग घटना समितीत सामील झाली नव्हती. तर भारतातील फक्त 7 संस्थानीकांनी घटनासमितीत सहभाग नोंदविला होता. तर अनेक संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्याचा मनोदय व्यक्त केला होता. शेवटी 3 जूनची योजना तयार झाली आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. या कायद्यानुसार भारताची फाळणी होणार होती. मात्र संस्थानांची अशी  विभागणी करण्यात आली नव्हती. भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामिल व्हायचे नाही त्यांच्यासाठी 13 जून 1947 रोजी नेहरुंनी एक महत्वाची घोशणा केली होती. एखाद्या संस्थानाला पाकिस्तानमध्ये जाण्याचा हक्क आहे. पण स्वतंत्र राहण्याचा नाही. या विषयावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनीही आपली भूमिका ठामपणे मांडली होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी या विषयी 18 जून रोजी एक पत्रक प्रसिध्द करुन सांगितले की, भारताचे संस्थानावरील सर्वभौमत्व नष्ट  करण्याचा ब्रिटीश  पार्लमंेटला अधिकारच नाही. या सबंधी आगाती स्वातंत्र्याच्या कायद्यात केली जाणारी तरतूद आम्ही रद्दबादल व शून्यवत मानतो. भारत सरकार कोणत्याही संस्थानाला सार्वभौम वा स्वतंत्र म्हणून मान्यता देणार नाही असे आम्ही घोषीत करतो.
या संपुर्ण संस्थानाच्या विलीनीकरणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र संस्थान खाते तयार करुन त्याचे मंत्रीपद सरदार पटेलांकडे तर सचिवपद व्ही. पी. मेनन यांच्याकडे देण्यात आले. एकुण 40 दिवसांत यांना 565 संस्थानांचे विलीनिकरण करावयाचे होते. सरदार पटेलांनी एका भाषणांत मोठी चुक केली ते म्हणाले की, तुम्हाला फक्त संरक्षण, दळणवळण आणि परराष्ट्र  या तीनच गोष्टींसाठी सामील व्हायचे आहे. बाकी सर्व विषयांत तुम्ही स्वातंत्र असाल. तुमची ही स्वायत्तता आम्ही काटेकोरपणे पाळणार आहोत. असे अव्हान केल्याने 560 संस्थाने भारतात सामिल झााले मात्र हैद्राबाद, काश्मीर, जुनागड, मंगरोल आणि मानवदर या पाच संस्थानांनी भारतात सामिल होण्यास नकार दिला. यातील चार संस्थानांचे राजे मुस्लीम आणि बहुसंख्य प्रजा हिंदू होती तर काष्मिरचा राजा हिंदू आणि बहुसंख्य प्रजा मुस्लीम होती. पाच राज्य भारतात अथवा पाकिस्तानमध्ये सामिल होण्यास तयार नव्हती. स्वतंत्र राहण्याचा त्यांचा विचार होता परंतु त्यांना तसे न राहू देता त्यांना भारतात सामील करुन घेतले, काश्मीर बाबत असे करता आले नाही आणि तसे शक्तिशाली प्रयत्नही भारत सरकारणे केले नाहीत. शेख आब्दुलांनीही भारतात सामिल न होण्याचे कारण जनतेला पटवून दिले ते म्हणाले की, भारतात जाण्याचा एक तोटा म्हणजे तेथे हिंदूत्ववादी शक्ती झपाटयाने वाढत आहे. पुढे जर भारत हिंदू राज्य बनले तर मुस्लिमांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल. याचाच अर्थ भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची भारत पाकिस्तान अशी  फाळणी झाली नाही तर, भारत, पाकिस्तान आणि काश्मीर अशी झाली असेच म्हणावे लागेल. कारण पुढे काश्मीरने भारताच्या संविधानातच स्वायत्ततेचे 370 हे कलम मंजूर करुन घेतले आणि फक्त सरदार पटेलांनी अव्हान केल्याप्रमाणे ‘संरक्षण, दळणवळण आणि परराष्ट्र  व्यवहार’ या तीनच अटीवर काश्मीर भारतात सामील झाला असेच म्हणावे लागेल. कारण 370 व्या कलमानुसार भारताकडे काश्मीरसबंधी फक्त जबाबदारीच आहे. तर सर्व हक्क काश्मीरकडे राहिले आहेत. या कलमानुसार भारत केवळ काश्मीरचे संरक्षण करत आहे, दळणवळणााला मदत करतो आहे आणि परराष्ट्र  व्यवहारात थोडेफार सहकार्य याच्यापलीकडे भारताचे काश्मीर वर कोणतेच अधिकार नाहीत. कारण जम्मू काश्मीरच्या राज्यघटनेतील कलम 3 नुसार जम्मू-काश्मीर हे राज्य भारताचा एक अविभाज्य भाग आहे व असेल. असे असले तरी त्याच राज्यघटनेतील कलम 144 राज्याचा एक वेगळा ध्वज असल्याचे सांगते. 370 वे कलम भारत आणि काश्मीर मध्ये कुठेतरी दरी निर्माण करत आहे. ही दरी संपवूनकाश्मीरच्या विकासासाठीच म्हणून पाकिस्मानमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या भविष्यातील  विकासाचा मुद्दा सरदार पटेल, गांधी व नेहरु यांनी जर पटवून दिला असता तर कदाचित त्याच वेळेस विनाशर्त काश्मीरची जनता व्दिधा मनःस्थितीत न राहता ती भारतात सामील झाली असती. शेख अबदुलांनी काश्मीर मुस्लिमांना भारत भविश्यात हिंदू राष्ट्र बनेल व आपले भवितव्य धोक्यात येईल हे पटवून दिले. म्हणून आजपर्यंत हा मुद्दा भारतासाठी डोकेदुखी होवून बसला आहे.
खरे तर हा विषय मिटविण्यासाठी नेहरुंनी एक चुक केली होती ती अशी  की, हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेत मांडला आणि काश्मीर प्रांत भारतात सामिल करायचे की पाकिस्तानमध्ये यावर स्थायी सदस्यांनी आपली भूमिका मांडली एकुण पाच स्थायी सदस्यापैकी चार सदस्यांनी काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले तर एकमेव रशियाने नकाराधिकाराचा वापर करुन काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असलयाचे मत व्यक्त केले. जेव्हा चार स्थायी सदस्यांचा पाठिंबा पाकिस्तानला मिळाला तेव्हापासून पाकिस्तानने आपली संपुर्ण शक्ती काश्मीर मिळविण्यासाठी लावली आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नावर महत्वाचा सल्ला भारत सरकारला दिला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करुन नेहरु युनोच्या दारात पोहचले आणि निराश  होवून परतले. त्यांनी हा प्रश्न युनोमध्ये घेवून न जाता जर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सल्याप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित भारताची वाढलेली डोकेदुखी केंव्हाच कमी झाली असती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 1947 सालीच म्हणाले होते की, महार बटालियन लावून संपुर्ण काश्मीरच ताब्यात घ्या. किंवा काश्मीर खोरे जेथे बहुसंख्य मुस्मिल आहेत, लडाख जेथे बौध्द आहेत आािण् जम्मू जेथे हिंदू आहेत असे तीन भाग करुन लडाख आणि जम्मूचा भाग भारताला जोडा आणि काश्मीर खोरे जेथे मुस्लीम आहेत त्या भागात मतदान घेवून ज्यांना पाकिस्तान मध्ये जायचे आहे त्यांना पाकिस्तानमध्ये जावू द्या आणि ज्यांना भारतात राहायचे आहे त्यांना भारतात राहू द्या. हा सोपा मार्ग डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला होता मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने हा विषय स्वातंत्र्याच्या 67 वर्शानंतरही भारतासाठी डोकेदुखी झाला आहे.  भविष्यात  हा प्रश्न तिव्र रुप धारण करेल याची कल्पना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना होती म्हणूनच त्यांनी काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम 370 लिहण्यास नकार दिला शेवटी पंडीत नेहरु यांच्या आग्रहाखातर गोपालस्वामी अयंगर यांनी हे कलम लिहले. 


Article 370, Jammu Kashmir, New states, constitutional ammendame 2020

Wednesday, March 6, 2019

हिंदू राष्ट्रवादाची नव्याने चिकित्सा







प्रा. ज्ञानेश्वर कांबळे 
-लेखक, मराठी साहित्याचे समीक्षक आहेत.

डाॅ. ह. नि. सोनकांबळे यांनी लिहलेला "हिंदू राष्ट्रवाद: परिवर्तनशील भारतीय समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका" हा ग्रंथ जनमानसात चिंतन करायला भाग पाडून भविश्यातली चिंता दाखवून देणारा आहे आणि हिंदू राष्ट्रवादाची नव्याने चिकित्सा करणारा ग्रंथ आहे. 


हा ग्रंथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आहे, हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. खरे तर संघावर अनेक लेखकांनी अनेक ग्रंथ लिहिलेली आहेत. त्यात रावसाहेब कसबे यांनी ‘झोत’ लिहून संघावर प्रकाश टाकला आणि पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उर्जा पुरविण्याचे काम या पुस्तकाने केले. त्यानंतर बाबा आढाव, जयदेव डोळे यांनीही संघावर पुस्तके लिहिली आहेत. इंग्रजी भाषेतही काही लेखकांनी संघावर लिहिले आहे. संघावर लिहिलेली उपरोक्त पुस्तके संघाच्या कार्यप्रणालीची प्रसंगोपात्त मिमांसा करणारी आहेत. जयदेव डोळे यांचे आरेएसएस हे पुस्तक संघाची दुगली भूमिका स्पष्ट करीत, संघाच्या कटकारस्थनाचा आंतरभाग उजागर करताना दिसतो. पण संघाचा व्याप, संघाचा अंतबाह्रया चेहरा त्याची पाळेमुळे शोधण्यासाठी एवढे लिखन अपुरे होते हे या ग्रंथाच्या वाचनानंतर लक्षात येते. डाॅ. ह. नि. सोनकांबळे यांचे पुस्तक आशयाच्या व्यापकतेनुसार संघाचे पाळेमूळे शोधून संघाच्या तत्त्व आणि कार्यप्रणालीची मिमांसा करीत संघाच्या दुटप्पी प्रणालीचे पितळ उघडे पाडणारे व पुरोगामी चळवळीतल्या संवेदनशील कार्यकर्त्याची झोप उडवणारे आहे. या पुस्तकाच्या शीर्षकापासून ते मलपृष्ठापर्यंत येणारा प्रत्येक शब्द देशात आलेल्या आणि येउ घातलेल्या अरिष्ठाच सूचन करणारा आहे. याकडे जर दुर्लक्ष झाले तर? ......तर... याचेही उत्तर या पुस्तकातून मिळते. 


या ग्रंथाची प्रस्तावणा मुळातून वाचण्यासारखी आहे. एखाद्या संघीय व्यक्तीने ही प्रस्तावना नजरेखालून घातली तर आपण जे काही कार्य करीत आहोत ते कोणत्याही ‘मानुष’तेला धरुन नसल्यामुळे आपला फक्त उपदव्याप आहे, हे त्याला कळून चूकल्याशिवाय राहणार नाही. पण .... संघात अशी माणसे आहेत कुठे? बुध्दी चालवणाऱ्या , विचार करणाऱ्या माणसाला संघात प्रवेश नाही. ‘एकचालकानुवर्ती’ वृत्ती ही संघाची कार्यप्रणाली आहे. बालपणापासून व्यक्तीवर तसे संस्कार केले जातात, त्याला तसे घडवले जाते, अगदी साच्यासारखे. संघ एक साच्या आहे. त्यातला कोणताही व्यक्ती बोलत नसतो. तो काम करीत असतो. म्हणून लेखकाने संघाची तुलना ‘फॅसिझम’शी केलेली आहे. या देशातला कितीही मोठा बुध्दीवादी व्यक्ती, संघाची ही विचारधारा मानत असेल तरच तो मोठा, तरच तो राष्ट्रवादी अन्यथा तो क्षुद्र आणि राष्ट्रद्वेष्टा असतो. हे अगदी स़द्यकाळातील भारतीय पर्यावरण लक्षात घेतले तर लक्षात यईल. 


जगतीक पातळीवर वंश आणि वर्णाच्या संरक्षणातून, अहंकारातून ज्या फॅसिझम, ईखवानुल मुसलमीन या वृत्तीची निर्मिती झाली अगदी त्याच वृत्तीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती झाली. भारतीय पुरातन परंपरा, संस्कृती, भाषा आणि कायदा जतन करणे हे संघाचे उद्दिष्टे आहे. शाखेत शिक्षण पूर्ण झाालेल्या व्यक्तिंनाच संघात सहभागी करुन घेतले जाते. संघात सहभागी करुन घेताना त्याला जी शपथ दिली जाते. ती आज चिंता करायला लावणारी बाब आहे. ‘सर्वात बलिष्ठ परमेश्वर आणि माझे पुर्वज यांना स्मरुन मी अशी शपथ घेतो की, पवित्र हिंदू धर्म, हिंदू समाज व हिंदू संस्कृती यांच्या विकासाला उत्तेजन देउन भारतवर्षाची सर्वांगीन उन्नती साधण्यासाठी मी...... मी माझी शपथ जन्मभर पाळेन. जय बजरंग बली, बली बलभीम की जय. ही शपथ देशाच्या मंत्रीमंडळात सहभागी करुन घेताना प्रत्येक मंत्र्याला दिली जात नसावी असे कोण म्हणेल? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हीच भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था आहे. संघ लोकशाही, राज्यघटना, तिरंगा, कायदा, निवडणूक प्रक्रिया मुळातून मानीतच नाही. म्हणून प्रत्येक मंत्र्याला उजागर दिली जाणारी शपथ वेगळी आणि संघकार्यालयात दिली जाणारी गुप्त शपथ वेगळी, असे नसेल कशावरुन. केंद्रीय मंत्रीमंडळातील काही मंत्र्याच्या तोंडून निघालेली वक्तव्ये ऐकली की, या मंत्र्याना उपरोक्त शपथ दिली जाते, या विधानाला पुष्टी मिळते. 


या देशात धर्म आणि धर्मग्रंथांनी लादलेल्या गुलामगिरीत, दमणकारी व्यवस्थेत, शतकानुशतकापासून शोषण झालेला कर्मकवषाकसिंध्दांताने बटीक केलेल्या संस्कृतीत पिचत पडलेला, बहुजन वर्ग स्वातंत्र भारताच्या राज्यघटनेने थोडाफार श्वास घेतोय ती राज्यघटनाच नाकारायची म्हणजे? पुन्हा मनुस्मृती लागू करायची! माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणतात मनुस्मृती सारखा चांगला कायदा असताना राज्यघटनेची आवष्यकताच काय? हे कसे सहन करायचे? हा प्रश्नच आहे. संघ हा हिंदू धर्माला धर्म मानतच नाही. तर हिंदू धर्म हा धर्म नसून ते राष्ट्र आहे असे मानतो. आणि हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था हे अर्थव्यवस्थेचे विकेंद्रिकरण आहे म्हणून जातीव्यवस्था मजबूत झाली तरच राष्ट्राची उन्नती होते ही भाबडी मनोधारणा, भाबडया लोकमानसात रुजवण्याचा प्रयत्न करताना हिंदू धर्म आणि धर्मग्रंथांनी निर्माण केलेल्या मिथकांना, प्रतिकांना मातृत्वाच्या ठिकाणी ठेवून त्यांना राष्ट्रीयत्वाच्या मुख्य प्रवाहात आनतात, त्या दृष्टीने ‘गाय’ या प्राण्याचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. ज्या सावरकरांना संघ पुज्यस्थानी मानतो ते वि. दा. सावरकर गायीला प्राणी समजतात देवता मानत नाहीत. ‘गाय ही गाढवाची देवता होउ शकते परंतु गाईला देव म्हणायचा गाढवपणा माणसाने करु नये.’ असे सांगतात, त्या गाईला संघ मातृत्व बहाल करतो आणि तिच्या हिंसेबददल जाहीर मानवी कत्तली केल्या जातात. संघाच्या कृतीचे सखोल चिंतन लेखक ह. नि. सोनकांबळे यांनी या पुस्तकातून मांडले आहे. या सनातनी वृत्तीला विरोध करणारा जो कोणी असेल तो राष्ट्रद्रोही आहे आणि तो संघाचा शत्रू आहे. मग संघाचे शत्रू कोण? ख्रिश्चन, मुस्लीम आणि कम्युनिष्ट. खरेतर संघाचे शत्रू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर असायला पाहिजे होते, पण नाहीत, म्हणजे हिंदू धर्मव्यवस्थेला विरोध करुन ज्यांनी बौध्दधम्म स्विकारला, हिंदू धर्माची चिकित्सा करुन चिरफाड केली तरीही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे संघाचे शत्रू नाहीत ही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. याची सखोल मिमांसा या पुस्तकातून आलेली आहे. 


या ग्रंथात चार प्रकरणे आहेत, दुसऱ्या प्रकरणात लेखकाने स्थापनेपासून ते आजपर्यंत विस्तारलेल्या संघाचा आढावा घेतला आहे. संघाचा हा विस्तिर्णपट पाहिल्यानंतर वाचक स्थगीत झाल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर एखादा संघीय सुध्दा भांबावून जाईल कारण संघाची कार्यप्रणाली कामालीची गुप्त असते. म्हणून संघाचे बाह्रयरुप आगदी लोभस, निरागस तेवढेच आपणाला माहीत आहे. त्यांचे लपून असलेले विस्तीर्ण अंतरंग लेखकाने उजागर केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था आणि या मातेला जन्मलेली आपत्य कोणत्या स्तरावर कसले उपदव्याप करते आणि तिचे जाळे किती सर्वदूर पसरले आहे याची साद्यंत आणि सखोल मांडणी या प्रकरणात आहे. त्याबरोबरच या ग्रंथाच्या तिसऱ्या आणि चैथ्या प्रकरणात भारतीय परिप्रेक्षातील नामवंत म्हणवल्या जाणाऱ्या राष्ट्रानेत्यांकडून संघाला कशी मदत झाली आणि संघाच्या कार्यप्रणालीवर कोणकोणत्या संरसंघचालकाचा ठसा आहे? संघाने आपल्या धोरणात कसा कसा बदल केला? आपले मुख्य सनातन उद्दिष्टये साकार करण्यासाठी संघाने कोणती निती वापरली? भारतीय जनता पार्टीचे सरकार बहुमताने कसे आले? भविष्यात जर पुरोगामी संघटना सजग झाल्या नाहीत तर काय होईल? या प्रश्नांची उत्तरे हा ग्रंथ मुळातून वाचल्याशिवाय कळणार नाहीत. अतिशय चिकाटीने संशोधन करुन हा ग्रंथ लिहिल्यामूळे लेखकाचे आणि या अराजकतेच्या वातावरणात प्रकाशकाने छापले या दोघांचे त्यांच्या धाडसाबदल अभिनंदन करावे तेवढे कमी आहे. 


शेवटी परंपरापोशित संरजामी मूल्यावस्था आणि वर्णव्यवस्था राबवणाऱ्या यंत्रणा पेशवाई आपल्या हातात ठेवत असते नव्हे, ती अशी यंत्रणाच बनवते. पेशवाई ही यंत्रणाच घातक आहे. दमनकारी आहे, हे इतिहासाने सिध्द केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातून पेशवाई कधी आणि कशी निर्माण केली हे जसे इतिहासातील लोकांना कळू दिले नाही. 1818 ला कोरेगावच्या लढाईत पेशवाई नष्ट झाल्यानंतर आगदी पुण्यातील सर्वच स्त्रियांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला असे लोकहितवादी सांगतात यावरुन पेशवाई किती धूर्त, दमनकारी होती याची प्रचिती येते. तशीच आजही नव्यानं दूसरी पेशवाई कशी निर्माण झाली ही आपणाला कल्पनाच नाही, पण त्याच पेशवाईची ही पूनरावृत्ती झाली हे सद्यकालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृृतीक या सर्वच क्षेत्रातील वातावरणातील गढूळतेमूळे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. हे मूळातून समजून घ्यायचे असेल आणि सजग व्हायचे असेल तर वाचक मूळातून हा ग्रंथ वाचतील असा विश्वास व्यक्त करतो. 


हिंदू राष्ट्रवाद: परिवर्तनशील भारतीय समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका 
लेखक: डाॅ. ह. नि. सोनकांबळे 
प्रकाशक : भाष्य प्रकाशन मुंबई 
एकुण पृष्ठे: 272, किंमत: 350रु.


Wednesday, December 19, 2018

गीता वाटपाचे कर्म



गीता वाटपाचे कर्म

डाॅ. ह. नि. सोनकांबळे 
dr.hanisonkamble@gmail.com


कार्ल मार्क्स ने समाजाची विभागणी जरी दोन वर्गात केली असली तरी बहुरंगी संसकृती असलेल्या भारतात मात्र प्रमुख्याने तीन वर्ग आहेत. श्रीमंत, मध्यम आणि गरीब यातल्या पहिल्या आणि तिसऱ्या वर्गाला धर्माशी, दैववादाशी काही एक देणे घेणे नसते. तो त्याचे पालन सोईनुसार  करत असतो. कारण या वर्गाचे भाकरीचे प्रश्न मिटलेले असतात आणि आम्ही जे काही ऐश्वर्य प्राप्त केले आहे ते स्वकष्टाचे आहे यात कोणत्याही धर्मीक अथवा दैवी शक्तीचा हस्तक्षेप नाही याची जाणीव या वर्गाला झालेली असते. यातल्या तिसऱ्या वर्गाचे भाकरीचे प्रश्न मिटलेले नसतात त्यामूळे या वर्गाला जो आज आपल्याला भाकर देतो तोच आपला धर्म आहे असे वाटत असते. प्रश्न आहे तो मध्यम वर्गाचा त्याला कधीच खालच्या वर्गात यावे वाटत नाही आणि वरच्या वर्गात जाण्याची धडपड जरी त्यांची असली तरी त्याला दैवी शक्ती प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही असे वाटत असते. म्हणून तो नेहमी या दैवी शक्तीला जागृत करण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि धर्माच्या प्रचार प्रसाराने आणि आचरणाने ईश्वर खुश होत असतो असे त्याला वाटत असते. त्यामूळे तो ‘स्वकर्मणा तमभ्यच्र्य सिध्दि विन्दत मानवः!’ असे म्हणून चालत असतो. म्हणूनच की काय जाॅन ब्रेमन हा हिटलरकालीन विचारवंत ‘द हिंदू राईट’ या लेखात असे म्हणतो की, मध्यम वर्गच खऱ्या  अर्थाने धार्मिक विचाराला खतपाणी घालत असतो. याच वर्गाने भारतात हिंदूत्ववाद आणि जर्मनीत फॅसिझमचा प्रभाव वाढविण्यासाठी हातभार लावला आहे. असा दावाही त्याने आहे रो कदाचित खरंच असावा.  म्हणून भारतात सध्या महावि़द्यालयामध्ये सुरु असलेला गीता वाटपाचा कार्यक्रम बहुरंगी संस्कृती असलेल्या भारताला काही नवीन आहे अशातला भाग नाही. परंतु या सर्वच धर्म ग्रंथाला हिंदू धर्मातच दोन बाजू आहेत.
    पहिली बाजू मांडताना सावरकर असे म्हणता की, हिंदू धर्मात जे प्राचिन आणि हिंदू धर्माला मार्गदर्शक ठरले ते सर्व धर्मग्रंथ कालबाहय ठरले असून ते नष्ट करावेत अथवा कोपऱ्यात टाकून द्यावेत.  आणि दुसरी बाजू मांडताना गोळवलकर असे म्हणतात की, भगवतगीता आणि वेद हे हिंदुत्वाचे आधार आणि प्रमाण आहेत. म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आता प्रश्न असा आहे की, जर सावरकरांचे म्हणने न ऐकता गोळवलकरांच्या म्हणण्याप्रमाणे या धर्म ग्रंथांना प्रमाण माणले तर समाजातल पहिला वर्ग जो अर्थातच प्रचंड श्रीमंत आहे तो याचे पालन करेल का? कारण गोळवलकरांची अशी अपेक्षा आहे की, मनूने सांगितल्याप्रमाणे ‘यावत भ्रियेत जठरं तावत स्वत्वं हि देहिनाम’ अधिक योद्यभिमन्येत स स्तेनो दण्डमर्हति’ याचा अर्थ देहधारणेला जेवढे आवश्यक असेल तेवढेच ग्रहण करा, त्याहून जो अधिक ग्रहण करतो तो चोर आहे आणि म्हणूनच तो दंडणीय आहे. याचा अर्थ पहिला वर्ग या शिक्षेस पात्र आहे असेच म्हणावे लागेल. पण धर्म ग्रंथाचे वाटप करणारे सरकार या धर्म ग्रंथाचा आधार घेवून यांना शिक्षा करेल का? म्हणून धर्म ग्रंथ वाटणे आणि त्याचे पालन करणे या दोन वेगवेगळया गोष्टी आहेत. आपण कितीही जबरदस्तीने या धर्म ग्रंथाचे वाटप केले तरी ते घरात ठेवायचे की सावरकरांकडे द्यायचे याचा विचार सुज्ञ लोकांनी करायचा असतो.
    तसा हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असून तो फार जूना आहे. 1982 ला दत्तोपंत ठेंगडी यांनी स्थापन केलेल्या ‘भारतीय विचार केंद्रम’ या संस्थेने गीता या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘भारतीय विचार केंद्रम रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट’ या नावाने विविध विद्यापीठात शाखा सुरु केल्या आणि 1998 हे वर्ष ‘गीता वर्ष’ म्हणून साजरे केले. त्या निमित्ताने केरळ या राज्यात 400 गीता शिबीराचे आयोजन करण्यात आले. इतकेच नाही तर ‘द भगवत गीता अॅन्ड माॅडर्न प्राॅब्लेम’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्र देखिल भरविण्यात आले. परंतु तुर्तास तरी या सर्व कार्यक्रमाचा केरळ मध्ये काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. कारण आता लोक प्रत्येक वस्तूची उपयुक्तता बघून ठरवतात की, एखाद्याने आपल्याला फुकटात काही दिले तर ते घ्यायचे की नाही?  
    म्हणून एखाद्याने फुकटात गीता वाटली, दुसर्याने कुराण वाटले, तिसऱ्याने बायबल वाटले आणि चैथ्याने जर संविधान वाटले तर वाचणारा व्यक्ती काही अडाणी नाही तो वाचेल आणि आपल्या घरात आणि डोक्यात काय ठेवायचे याचा विचार करेल. कारण हजारो वर्षापासूनच्या गुलामीतून ज्या ग्रंथाने आम्हाला मुक्त केले तो ग्रंथ प्रमाण मानायचा की ज्या ग्रंथांनी गुलाम ठेवले ते ग्रंथ प्रमाण मानायचे हे लोकच ठरवतील. कारण या ग्रंथांना जर लोकांनी प्रमाण मानले असते तर आज हे ग्रंथ लोकांच्या घरात असते आज असे मोफत वाटण्याची वेळ सरकारवर किंवा कोणत्याही धार्मिक संस्थेवर आली नसती.  आणखी एक गोष्ट हे ग्रंथ वाटणाऱ्यानी लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्या या कृतीमूळे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा जनतेषी संघर्ष निर्माण होता कामा नये. आणि असा संघर्ष  भविष्यात निर्माण झालाच तर फिलिपिन्स च्या राष्ट्राध्याक्षाप्रमाणे ईश्वराचे  अस्तित्व सिध्द करुन दाखवा असा प्रश्न जनताच या दोन्ही सत्तेला विचारेल आणि हे जर सिध्द नाही करता आले तर आपल्याला ठावूकच आहे फुकटच्या वस्तूची किंमत ही नेहमी शून्यच असते. तरी परंतु या ग्रंथाला पुन्हा एकदा किंमत प्राप्त व्हावी हा हेतू जर गीता वाटपाच्या कर्मामागे असेल तर त्यांनी उद्या निर्माण होणाऱ्या  प्रश्नाच्या उत्तरासह सज्ज रहावे.  अन्यथा धर्म आणि धर्मग्रंथ दोन्ही खोटे ठरण्याची शक्यता आहे.

डाॅ. ह. नि. सोनकांबळे
लेखक: राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. 

महाराष्ट्र टाइम्स  प्रकाशित लेख १५ जुलै २०१८

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रविकासाची ब्लू (निळी) प्रिंट




डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रविकासाची ब्लू प्रिंट 
 
डॉ. ह. नि. सोनकांबळे
dr.hanisonkamble@gmail.com


विनंती :  कृपया बाजूला असलेल्या Follow या बटनावर क्लिक करा.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्यावर अतिषय समर्पक भाष्य अत्रे यांच्या लेखणीतून बाहेर आल्याचे दिसते. आचार्य प्र. के. अत्रे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘नवभारताचे निर्माते’ असे संबोधले आणि यातच सर्व काही आले असे म्हणावयास हरकत नाही. पण त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाला समजून घेण्यास आमचे व्यक्तीमत्व मात्र नंतरच्या काळात खुजे पडले हे मान्यच करावे लागेल. आजही त्यांच्यावर होणारी टीका हे त्याचेच द्योतक आहे. परंतु दिवसेंदिवस भारतीय राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हा विषय महत्वाचा आणि गांभीर्याचा बनत चालला आहे. एके काळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘दलित’ या शब्दात बंदीस्त करण्यासाठी अनेकांनी टोकाचे प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते. कारण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे नंतरच्या काळात केवळ भारतापुरते मर्यादित राहिल्याचे दिसत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष थाबो एम्बकी यांनी जानेवारी 2008 मध्ये त्यांच्या संसदेत दिलेले भाषण, ब्रिटीश पार्लमंेटचे सदस्य जेरमी कार्बीन यांनी अनेक वेळा ब्रिटीश संसदेमध्ये दिलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संदर्भ आणि त्याच संसदेचे सदस्य जेफ्री हून यांनी भारताची केलेली आधुनिक व्याख्या याशिवाय, शिक्षणक्षेत्रात केलंबिया विद्यापीठ, सायमन फ्रेजर विद्यापीठ, याॅर्क विद्यापीठ, आणि लंडन स्कूल आॅफ इकाॅनाॅमिक्स मध्ये वेळो वेळी होणारी चर्चा आणि हंगेरी मध्ये त्यांच्या नावाने उभरण्यात आलेल्या शाळा, या जागतीक स्तरावरच्या घटना त्यांच्या विचारांची प्रासंगीकता आणि महत्व सिध्द करतात. 


भारतात मात्र आजूनही त्यांची ओळख ‘दलीत’ या शब्दाअंतर्गत करण्याचा प्रयत्न अनेक लोक करत आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व काही दलितांसाठी केले आम्हा हिंदूसाठी काहीच केले नाही. ही भावना इथल्या काही हिंदूमध्ये आजही आहे. याचे उत्तर इथल्या हिंदू धर्मातील लोकांना समजावून सांगत असताना आणि सावरकर ते भाजप या ग्रंथाचा शेवट करत असताना स. ह. देशपांडे यांनी दिलेले उत्तर मला हिंदू जनतेसाठी महत्वाचे वाटते. ते म्हणतात, ‘डाॅ. आंबेडकरांनी 1927 सालीच हिंदुमात्रांच्या जन्मसिध्द हक्काचा जाहिरनामा प्रसिध्द केला होता त्यात नव्या समाजरचनेची सूत्रे सांगीतली होती. हया विषम समाजरचनेची कडू फळे चाखायचे नशिबी आलेला पण मन हिंदुत्वाएवढे मोठे केलेला एक दलित विव्दान आणि लढवयया नेता साठसत्तर वर्षांपूर्वी हिंदुसंघटनपक्षास मिळाला असता तर देशाच्या इतिहासाला कलाटणी मिळाली असती. ती संधी त्या काळच्या हिंदुत्ववाद्यांनी घालवली आहे. परंतु ती संधी आजच्या हिंदूंनी तरी घालवू नये असे मला वाटते. देशपांडे यांच्या या वाक्याचा अर्थ आजच्या हिंदू पिढीनेतरी समजून घेतला पाहिजे. कारण या देशातल्या सर्व जनतेच्या उध्दाराचा विचार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. 


देशाची फाळणी होण्याच्या आगोदरच त्यांनी लोकसंख्येच्या आदलाबदलीचा विचार मांडला होता. कारण एकवेळेस पाकिस्तानमध्ये जर हिंदू जनता अडकून राहिली तर त्यांना भविष्यात खूप त्रास सहन करावा लागेल याची जाणीव त्यांना होती. परंतु त्याकडे तत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्लक्ष केले गेले. फाळणी झाल्यानंतर देखिल पाकिस्तानात अडकून पडलेल्या हिंदूंना भारतात आणण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरु आणि पटेलांकडे आग्रह धरला आणि महार बटालियन पाठवून पाकिस्तानातल्या हिंदूंना भारतात आणले गेले. परंतु या गोष्टी आपण आजही समजून घेत नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळयात नेहमी हे राष्ट्र आणि या राष्ट्रात राहणारा व्यक्ती होता. त्यांनी या दोघांच्या विकासाचा जेवढा विचार केला होता तेवढा कदाचितच कोणत्या नेत्याने केला असावा. म्हणूनच प्र. के अत्रे असे म्हणतात की, ‘अखंड भारताचा, ऐक्याचा आणि स्वातंत्र्याचा त्यांच्याएवढा प्रचंड निष्ठावंत पुरस्कर्ता या देशात दुसरा नाही. परंतु त्यांना आपण केवळ हिंदूंचे आणि भारतीय स्वातंत्र्याचे विरोधक एवढयापुरतेच मर्यादित समजून घेतले. 

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच ‘दलित’ या घटकापूरता मर्यादित आणि संकूचित विचार केला नाही. भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणीक विकासाची ‘निळी प्रिंट’ (ब्लू प्रिंट) त्यांनी आगोदरच तयार करुन ठेवली होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीमत्व केवळ आजचा विचार करणारे नव्हते ते आजच्यासह उद्याचाही विचार करायचे. या देषाला एका वेगळया उंचीवर नेवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. म्हणूनच नवयुगच्या एका लेखात अत्रे यांनी स्पष्ट पणे असे आवाहन केले होते की, अमेरिका आणि रशिया यांच्याशी स्पर्धा करण्याइतके सामर्त्य या देशाच्या अंगी यावे असे आपल्याला जर वाटत असेल, तर आपण हया देशाच्या भवितव्याची सूत्रे नेहरु आणि आंबेडकरांसारख्या अव्दितीय बुध्दिमत्तेच्या मुत्सुद्यांच्या हाती सोपविली पोहिजेत. परंतु भविष्यात तसे झाले नाही. वेळोवेळी त्यांना हिंदू विरोधी विशेषणे लावून त्यांचा राजकीय पराभव केला गेला. यासाठी अडाणी आणि धर्मभोळया जनतेचा त्यांच्या विरोधात वापर केला गेला. 


त्यांनी जेव्हा स्त्रियांच्या उध्दारासाठी हिंदू कोड बिल मांडले तेव्हा अडाणी आणि धर्मभोळ्या स्त्रियांचा वापर त्यांच्या विरोधात केला गेला याचा स्पष्ट उल्ल्ेाख ग्रॅनव्हिल आॅस्टिन यांनी केला आहे. बाबासाहेबांच्या दिल्लीच्या निवासस्थानावर हिंदू कोड बिलाच्या विरोधात मोर्चा पाठवला गेला. आमच्या सांस्कृतीक वैभवाचे डाॅ. आंबेडकर हेच विरोधक आहेत असा भास कायम ठेवला गेला आणि त्यांच्या विकासाच्या ‘ब्लू प्रिंट’ ला सातत्याने विरोध होत गेला. पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे रसायनच असे होते की, त्यंानी आगोदरच सांगितले होते तुम्ही माझ्या विचाराकडे दुर्लक्ष करु शकत नाही आणि ते सार्थही ठरले. ज्या हिंदू कोड बिलासाठी त्यांनी अट्टाहास धरला होता परंतु ते तत्कालीन परिस्थितीत मंजूर झाले नाही. त्याच हिंदू कोड बिलावर आधारीत स्त्रियांच्या उध्दारासाठी भविष्यात बावीस हून अधिक कायदे तयार केले गेले. पण हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर अधारीत आहेत हे इथल्या व्यवस्थेने लोकांना कळूच दिले नाही. कामगार मंत्री असताना धनाबादच्या कोळशाच्या खाणीला भेट देवून आल्यानंतर गरोदर स्त्रियांना पगारी सुट्रया मिळाव्यात यासाठी कायदा त्यांनीच तयार केला. आज त्या कायद्यातील सुटयांचे प्रमाण सहा महिने झाले आहे. परंतु याची जाणीव किती भारतीय स्त्रीयांना आहे हा प्रश्नच आहे. म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेण्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत का? याचा शोध आम्हा भारतीयांनी घेतला पाहिजे. 


देशाला भेडसावणारे प्रश्न मग तो भारत पाकिस्तान फाळणीचा असो, काश्मीरचा असो की भारताच्या अंतर्गत आणि बाहय सुरक्षेचा असो अशा कितीतरी प्रश्नावर त्यांनी उत्तरे शोधून ठेवली आहेत. परंतु ते समजून घेवून त्याची आमलबजवाणी करण्यात आमची राजकीय शक्ती कमी पडत आहे असेच म्हणावे लागेल. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राच्या विकासाला चालणा देणारे नदी जोड प्रकल्प, उर्जा प्रकल्प,शै क्षणिक धोरणे याचा आराखडाच तयार केला होता. परंतु त्यांच्या जाण्याने अशी कितीतरी कामे आजही अपूर्णच आहेत. आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक राजकीय पक्षाच्या स्टेजवर दिसत आहेत परंतु त्यांच्या राष्ट्राच्या आणि मानवतेव्या विकासाची ब्लू प्रिंट कोणाकडेही नाही. ज्या दिवशी ही ब्लू प्रिंट घेवून एखादा राजकीय पक्ष या देशाच्या सत्तेवर येईल त्याच दिवशी आपण खऱ्या अर्थाने या महाकारुणीकाला समजून घेण्यात यशस्वी ठरणार आहोत. 

लेखक: एमजीएम विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व शासन विभागात सहाय्यक प्राद्यापक आहेत.